School News : नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होताच पालकांची मुलांच्या प्रवेशासाठी धावपळ सुरू झाली आहे. मात्र याच काळात राज्यातील बोगस आणि अनधिकृत शाळांबाबतची धक्कादायक माहिती समोर आली आहे. तपासादरम्यान राज्यात तब्बल 172 बोगस शाळा कार्यरत असल्याचे उघड झाले असून त्यामुळे पालकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे.
उपलब्ध माहितीनुसार, सर्वाधिक 132 बोगस शाळा मुंबईत आढळून आल्या आहेत. त्याखालोखाल पालघरमध्ये 20, ठाण्यात 18, तर नागपूर आणि नाशिकमध्ये प्रत्येकी एक बोगस शाळा असल्याची नोंद आहे.
अनेक शिक्षण संस्था केवळ इरादापत्र मिळाल्यानंतर शाळा सुरू करतात किंवा आवश्यक परवानगी न घेता शाळा दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित करतात. यामुळे विद्यार्थी आणि पालकांची दिशाभूल होत असून मुलांच्या शैक्षणिक भवितव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.
शिक्षण विभागाने अशा अनधिकृत शाळांविरोधात कठोर भूमिका घेतली आहे. बोगस शाळांवर सुरुवातीला 1 लाख रुपयांचा दंड आणि त्यानंतर दररोज 10 हजार रुपयांचा दंड आकारला जाणार आहे. तसेच अशा शाळांना पाठीशी घालणाऱ्या संबंधित शिक्षण अधिकाऱ्यांवरही कारवाई केली जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
पालकांनी शाळेत प्रवेश घेण्यापूर्वी काही बाबींची खात्री करून घ्यावी. शाळेचा शासकीय मान्यता क्रमांक, UDISE क्रमांक आणि संबंधित शिक्षण मंडळाचे संलग्नता प्रमाणपत्र तपासणे आवश्यक आहे. ही माहिती शाळेच्या प्रवेशद्वारावर किंवा मुख्य इमारतीवर प्रदर्शित करणे बंधनकारक असते.
याशिवाय शिक्षणाधिकारी कार्यालयाकडून वर्षातून दोन वेळा प्रसिद्ध होणारी अनधिकृत शाळांची यादीही पालकांनी तपासावी. शासनाकडून अनधिकृत शाळांच्या परिसरात इशारा देणारे फलक लावण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे.
दरम्यान, एखादी बोगस शाळा बंद झाल्यास तेथील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून त्यांना जवळच्या शासकीय किंवा मान्यताप्राप्त शाळांमध्ये प्रवेश दिला जाणार आहे. मात्र विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळणाऱ्या आणि पालकांची फसवणूक करणाऱ्या शाळांवर कठोर कारवाई कधी होणार, हा प्रश्न अद्याप कायम आहे.


