Pune Water Cut: यंदाच्या मान्सूनला झालेला उशीर आणि ‘एल निनो’च्या संभाव्य प्रभावामुळे पुणे शहरावर गंभीर जलसंकटाचे सावट निर्माण झाले आहे. खडकवासला धरण साखळीतील पाणीसाठ्यात मोठी घट झाली असून, चारही धरणांमध्ये मिळून सध्या केवळ ५.५ टीएमसी म्हणजेच २० टक्क्यांपेक्षा कमी पाणीसाठा उपलब्ध आहे. ही परिस्थिती लक्षात घेता पुणे महानगरपालिका शहरात एक दिवसाआड पाणीपुरवठा लागू करण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे.
मान्सूनमध्ये सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज
हवामान विभागाने (IMD) दिलेल्या सुधारित अंदाजानुसार, जून ते सप्टेंबर या कालावधीत यंदा सरासरीच्या केवळ ९० टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे धरणांमध्ये अपेक्षित पाणीसाठा जमा होण्याबाबत अनिश्चितता निर्माण झाली असून, संभाव्य पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी महापालिकेने आतापासूनच नियोजन सुरू केले आहे.
३१ ऑगस्टपर्यंत पाणी पुरवठा टिकवण्याचे आव्हान
राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार, उपलब्ध जलसाठा कोणत्याही परिस्थितीत ३१ ऑगस्टपर्यंत पुरेल याची काळजी घेणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता नंदकिशोर जगताप यांनी महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांच्याकडे एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा प्रस्ताव सादर केला आहे. या प्रस्तावावर अद्याप अंतिम निर्णय झालेला नसला तरी सर्वपक्षीय नेते आणि लोकप्रतिनिधींशी चर्चा करून पुढील निर्णय घेतला जाणार आहे. दरम्यान, जलसंपदा विभागाने पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकांना तातडीने १५ टक्के पाणीकपात करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
महापालिकेची तयारी; सूक्ष्म नियोजनाला सुरुवात
संभाव्य पाणीकपातीच्या पार्श्वभूमीवर बुधवारी महापालिका आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक पार पडली. या बैठकीत शहरातील पाणीपुरवठ्याचे सूक्ष्म नियोजन करण्याचे निर्देश देण्यात आले. प्रत्येक प्रभागासाठी स्वतंत्र आराखडा तयार करण्यात येणार असून, एक दिवसाआड पाणीपुरवठ्याचा निर्णय झाल्यास कोणत्या भागाला कोणत्या दिवशी आणि किती वेळ पाणी दिले जाईल याचे सविस्तर वेळापत्रक तयार करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.
पुढील आठवड्यात निर्णयाची शक्यता
पाणीकपातीचा थेट परिणाम लाखो पुणेकरांवर होणार असल्याने लोकप्रतिनिधींची मते जाणून घेतल्यानंतर पुढील आठवड्यात अंतिम निर्णय जाहीर केला जाण्याची शक्यता आहे. पाऊस आणखी लांबल्यास शहराला तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे प्रशासनाने नागरिकांना पाण्याचा वापर अत्यंत जपून आणि काटकसरीने करण्याचे आवाहन केले आहे.


