School Timing Change : राज्यात उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस वाढत असून मार्चच्या मध्यातच तापमानाचा पारा झपाट्याने चढू लागला आहे. काही ठिकाणी तापमान ४१ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचल्याने नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
गेल्या आठवड्यात डहाणू, मुंबई आणि ठाणे येथे तीव्र उष्णतेची लाट नोंदवण्यात आली होती. मुंबईत अनेक वर्षांनंतर तापमानाचा पारा ४० अंशांच्या आसपास पोहोचल्याने नागरिकांना उकाड्याचा त्रास सहन करावा लागत आहे. दरम्यान, काही भागात विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह पावसाचाही इशारा हवामान विभागाने दिला आहे.
या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात शाळांच्या वेळेत बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्ह्यातील प्राथमिक आणि माध्यमिक शाळा सोमवार, १६ मार्चपासून सकाळी ७ ते दुपारी १२.३० या वेळेत भरवण्यात येणार आहेत. या निर्णयाचा लाभ जिल्ह्यातील सुमारे ३०८० शाळांना होणार आहे.
संभाजीनगर जिल्ह्यात तापमानाचा पारा ४० अंशांच्या जवळ पोहोचल्याने विद्यार्थ्यांना दुपारच्या कडक उन्हाचा त्रास होऊ नये, यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.
दरम्यान, मध्य महाराष्ट्रात सर्वाधिक तापमानाची नोंद जळगाव येथे झाली असून जिल्ह्याचे तापमान ४१ अंश सेल्सिअस वर पोहोचले आहे. वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सतर्क झाले असून नागरिकांनी दुपारच्या वेळेत बाहेर पडताना विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.


