ताम्हिणी घाट : रायगड जिल्ह्यातील ताम्हिणी घाट परिसरात अंगावर शहारे आणणारी घटना उघडकीस आली आहे. पुण्याहून महाबळेश्वरला सहलीसाठी निघालेल्या एका तरुणाची त्याच्यासोबत असलेल्या मित्रांनीच निर्घृण हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. प्रवासादरम्यान झालेल्या पैशांच्या किरकोळ वादातून ही हत्या करण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी (११ जानेवारी) रात्री साडेअकराच्या सुमारास सणसवाडी गावच्या हद्दीतील ‘सिक्रेट पॉईंट’ परिसरात २५ ते ३० वयोगटातील एका तरुणाचा धारदार शस्त्राने खून झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला.
गुप्त बातमीदार, तांत्रिक विश्लेषण, सीसीटीव्ही फुटेज आणि मोबाईल लोकेशनच्या आधारे तपासाची चक्रे वेगाने फिरवण्यात आली. तपासात मृत तरुणाची ओळख आदित्य गणेश भगत (वय २२) अशी पटली. पुढील तपासात आदित्यसोबत प्रवास करणाऱ्या मित्रांनीच त्याची हत्या केल्याचे उघड झाले.
पोलिस चौकशीत समोर आलेल्या माहितीनुसार, आदित्य भगत, अनिकेत महेश वाघमारे, तुषार उर्फ सोन्या शरद पोटोळे आणि प्रज्वल उर्फ सोन्या संतोष हंबीर हे चौघे इनोव्हा क्रिस्टा कारमधून पुण्याहून ताम्हिणी घाट मार्गे महाबळेश्वरला निघाले होते. वाटेत पैशांवरून वाद झाला आणि या वादातून संतापलेल्या तरुणाने आदित्यचा गळा दाबून त्याची हत्या केली. त्यानंतर आरोपींनी आदित्यचा मृतदेह रस्त्याच्या कडेला फेकून पळ काढला.
मात्र पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपींना अटक केली आहे. या घटनेमुळे आदित्यच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.


