Solapur Accident : सोलापूरच्या विजापूर रोडवरील हात्तुरे ब्रिजजवळ मध्यरात्री झालेल्या भीषण अपघातात दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मित्राचा वाढदिवस साजरा करून घरी परतत असताना नियतीने त्यांच्यावर घाला घातला.
मृतांमध्ये रहमान मौला ढवळगी आणि राजू इमामसाब शेख यांचा समावेश आहे. दोघेही मित्र विजापूर रोडवरील एका हॉटेलमध्ये वाढदिवसाच्या कार्यक्रमाला गेले होते. कार्यक्रम आटोपल्यानंतर मोटारसायकलवरून सलगर वस्तीकडे परतत असताना हात्तुरे ब्रिजजवळ समोरून येणाऱ्या ट्रकची त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक बसली.
अपघात इतका भीषण होता की दोघांचाही घटनास्थळीच मृत्यू झाला. धडकेनंतर ट्रक चालक वाहनासह फरार झाला असून पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला आहे. या प्रकरणी विजापूर नाका पोलीस ठाण्यात अज्ञात ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दुर्घटनेमुळे सलगर वस्ती परिसरात शोककळा पसरली असून दोन्ही तरुणांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
नाशिकमध्येही भीषण अपघात
दरम्यान, नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यात मुंबई-आग्रा महामार्गावरील राहुड घाटात क्रेनचे ब्रेक फेल झाल्याने आणखी एक मोठी दुर्घटना घडली. भरधाव क्रेनने चार वाहनांना धडक दिल्याने एका चिमुरड्यासह दोन जणांचा मृत्यू झाला.
क्रेनने आयशर टेम्पो, कार आणि आपे रिक्षाला जोरदार धडक दिली. धडकेची तीव्रता इतकी होती की रिक्षाचा चक्काचूर झाला. स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदतकार्य सुरू करून जखमींना बाहेर काढले आणि रुग्णालयात दाखल केले. दोन्ही अपघातांमुळे राज्यात पुन्हा एकदा रस्ते सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून संबंधित प्रकरणांचा पोलीस तपास सुरू आहे.


