Ram Shinde : अहिल्यानगर विधान परिषद स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये अंतर्गत हालचालींना वेग आला असून उमेदवारीवरून पक्षात ‘निष्ठावंत विरुद्ध शब्द दिलेले चेहरे’ असा संघर्ष रंगण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांच्या वक्तव्यामुळे राजकीय चर्चांना अधिक उधाण आले आहे.
जामखेड तालुक्यातील चौंडी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर घेतलेल्या पत्रकार परिषदेत राम शिंदे यांनी “निष्ठावंत कार्यकर्त्यांनाच संधी मिळावी” अशी स्पष्ट भूमिका मांडली. त्यामुळे भाजपमध्ये उमेदवारीसाठी सुरू असलेल्या लॉबिंगला नवे वळण मिळाले आहे.
या पत्रकार परिषदेला देवळाली प्रवराचे नगराध्यक्ष सत्यजित कदम, भाजप दक्षिण जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग आणि अशोक खेडकर उपस्थित होते. विशेष म्हणजे पत्रकार परिषद सुरू होण्यापूर्वी सत्यजित कदम यांनी राम शिंदे यांच्यासोबत बंद दाराआड चर्चा केल्याची माहिती समोर आली. त्यानंतर कदम यांनी विधान परिषदेसाठी आपण इच्छुक असल्याचे उघडपणे सांगत मतदारांच्या भेटीगाठी सुरू केल्याचे स्पष्ट केले.
दरम्यान, भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष आणि माजी खासदार सुजय विखे पाटील यांच्या नावाचीही चर्चा सुरू आहे. मात्र यावर बोलताना राम शिंदे यांनी सावध भूमिका घेत सुजय विखे पाटील यांनी मागील दाराने प्रवेश करणार नसल्याचे आधीच सांगितले आहे, असे वक्तव्य केले.
राम शिंदे यांनी सत्यजित कदम, भानुदास बेरड आणि वसंत लोढा यांसारख्या निष्ठावान कार्यकर्त्यांचा उल्लेख करत पक्षाने निष्ठावंतांना न्याय द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. त्यामुळे भाजपमध्ये जुन्या कार्यकर्त्यांना संधी द्यायची की राजकीय समीकरणांनुसार ‘शब्दपूर्ती’ करायची, यावरून अंतर्गत संघर्ष तीव्र होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांनाही पुन्हा उधाण आले आहे. यावर बोलताना राम शिंदे म्हणाले की, राहुरी पोटनिवडणुकीवेळी तनपुरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विनंतीला मान देत मदत केली होती. मात्र त्यांनी अद्याप भाजपमध्ये प्रवेश केलेला नाही. त्यांच्या आणि फडणवीस यांच्यात काय चर्चा झाली आहे, हे योग्य वेळी समोर येईल, असे सूचक वक्तव्यही त्यांनी केले.
अखेरीस, विधान परिषद उमेदवारीचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्तरावर होणार असल्याचे राम शिंदे यांनी स्पष्ट केले. त्यामुळे आता स्थानिक पातळीवरील ताकद, निष्ठा आणि राजकीय समीकरणे यावर उमेदवारीचे गणित अवलंबून राहणार असल्याचे मानले जात आहे.


