NCP Crisis : महाविकास आघाडीतील राजकीय घडामोडींना वेग आला असून, ठाकरे गटातील सहा खासदारांच्या बंडानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षातही अंतर्गत मतभेद वाढत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, पक्षामध्ये सध्या दोन वेगवेगळे मतप्रवाह निर्माण झाले असून, यामुळे पक्ष नेतृत्वासमोर नवे आव्हान उभे राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पक्षातील एका गटाची भूमिका काँग्रेससोबत अधिक जवळीक साधत पक्षाच्या भविष्यासंदर्भात निर्णय घेण्याची आहे. तर दुसरा गट राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) सोबत जाण्याचा पर्याय खुला ठेवण्याच्या बाजूने असल्याचे बोलले जात आहे. या दोन मतप्रवाहांमुळे पक्षाच्या अंतर्गत वर्तुळात सध्या सुप्त संघर्ष सुरू असल्याची चर्चा आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, काही खासदार आणि नेत्यांचे मत असे आहे की, सध्याच्या राजकीय परिस्थितीत सत्ताधारी आघाडीसोबत राहिल्यास मतदारसंघांच्या विकासकामांना गती मिळू शकते. त्यामुळे एनडीएत घटक पक्ष म्हणून संधी मिळाल्यास त्याचा गांभीर्याने विचार व्हावा, अशी भूमिका काही नेत्यांनी मांडल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, पक्षातील दुसऱ्या गटाकडून काँग्रेससोबत राजकीय समन्वय वाढवण्याची भूमिका मांडली जात असल्याचेही समोर येत आहे. विरोधी पक्षात राहिल्यामुळे राज्य आणि केंद्र सरकारच्या विविध योजनांच्या अंमलबजावणीत अडचणी येत असल्याची भावना काही नेत्यांनी व्यक्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
या पार्श्वभूमीवर पक्षाचे प्रमुख शरद पवार आगामी काळात कोणती भूमिका घेणार, याकडे राज्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. त्यांनी विरोधी बाकांवर राहण्याचा निर्णय कायम ठेवल्यास पक्षातील काही नेते आणि आमदार वेगळी भूमिका घेऊ शकतात, अशीही चर्चा सुरू झाली आहे.
मात्र, पक्षातील वरिष्ठ नेत्यांकडून अशा सर्व चर्चांना फारसे महत्त्व नसल्याचे सांगितले जात असून, पक्ष एकसंध असल्याचा दावा करण्यात येत आहे. तरीही, सध्याच्या राजकीय घडामोडी आणि सत्तेत सहभागी होण्याची इच्छा असलेल्या काही नेत्यांच्या भूमिकेमुळे राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षासमोर आगामी काळात मोठे राजकीय आव्हान उभे राहण्याची शक्यता नाकारता येत नाही.


