सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष अजित बोरकर यांच्यावर तलवारी आणि लोखंडी रॉडने जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यात बोरकर गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर अकलूजमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. डॉक्टरांनी त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे सांगितले आहे.
प्राथमिक माहितीनुसार, गावातील दोन गटांमधील वाद मिटवण्याचा प्रयत्न केल्याचा राग मनात धरून काही जणांनी हा हल्ला केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी अकलूज पोलीस ठाण्यात सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींच्या शोधासाठी पोलिसांनी विशेष पथक नेमले आहे.
स्कॉर्पिओतून आले अन् थेट हल्ला
१९ जून रोजी सायंकाळी अजित बोरकर हे निमगाव पाटी येथील त्यांच्या कार्यालयाबाहेर मित्रांसोबत उभे होते. त्याचवेळी पांढऱ्या रंगाच्या स्कॉर्पिओमधून काही जण तेथे आले. “तू आमच्या वादात का पडतोस?” असा जाब विचारत त्यांनी बोरकर यांच्यावर अचानक हल्ला चढवला.
हल्लेखोरांनी तलवार आणि लोखंडी रॉडने सपासप वार केल्याने बोरकर गंभीर जखमी झाले. त्यांच्या खांद्यावर आणि कमरेवर खोल जखमा झाल्या असून त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.
सात जणांविरोधात गुन्हा
या प्रकरणात सोमनाथ रुपनवर, आर्यन बोरकर, रणजीत बोरकर, गणेश जानकर, गणेश मंडले यांच्यासह अन्य तीन अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींना अटक करण्यासाठी पोलीस पथके रवाना करण्यात आली असून तपास वेगाने सुरू आहे.
कार्यकर्त्यांमध्ये संताप
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यावर झालेल्या या हल्ल्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. हल्लेखोरांना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. या घटनेमुळे माळशिरस तालुक्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून पोलीस परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.


