Pune Crime : पुण्यातील फुरसुंगी परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका निवारागृहात कार्यरत असलेल्या २६ वर्षीय कर्मचाऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणात मृत कर्मचाऱ्याने लिहून ठेवलेल्या सुसाईड नोटच्या आधारे संस्थाचालकाविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, संस्थेतील कथित गैरप्रकारांचीही चौकशी सुरू करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फलटण तालुक्यातील वडले येथील रहिवासी अतुल अंकुश लाळगे (वय २६) हे गेल्या अडीच वर्षांपासून फुरसुंगी येथील श्री साई सेवाभावी संस्था संचालित खुले निवारागृहात कर्मचारी म्हणून कार्यरत होते. २२ जून रोजी दुपारच्या सुमारास त्यांनी निवारागृह परिसरात गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यानंतर त्यांना तातडीने उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
या घटनेनंतर मृताचे चुलत भाऊ अनिकेत लहुदास लाळगे यांनी फुरसुंगी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीनुसार, अतुल यांनी आत्महत्येपूर्वी लिहून ठेवलेल्या सुसाईड नोटमध्ये संस्थाचालक बालाजी मुस्कवाड यांच्याकडून होत असलेल्या कथित मानसिक छळाचा उल्लेख केला आहे.
फिर्यादीच्या म्हणण्यानुसार, कमी वेतनात अतिरिक्त काम करून घेणे, संस्थेतील विविध घटनांची जबाबदारी एकट्यावर टाकणे, नोकरी सोडल्यास आयुष्य उद्ध्वस्त करण्याची धमकी देणे, शिवीगाळ करणे आणि वैयक्तिक कामे करून घेणे, अशा प्रकारच्या त्रासाचा सामना अतुल यांना करावा लागत होता. याशिवाय, कर्मचारी असूनही त्यांच्यावर अनेक अतिरिक्त जबाबदाऱ्या टाकण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.
कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, वेळेवर वेतन न मिळणे, वाढता कामाचा ताण आणि वरिष्ठांकडून होणारा मानसिक दबाव यामुळे अतुल नैराश्यात गेले होते. आत्महत्येपूर्वी त्यांनी आपल्या बहिणीसह कुटुंबीयांकडे कामाच्या ठिकाणी होत असलेल्या त्रासाबद्दल नाराजी व्यक्त केल्याचा दावाही करण्यात आला आहे.
दरम्यान, सुसाईड नोटमध्ये संस्थेतील काही कथित गैरप्रकारांची चौकशी करून न्याय मिळावा, अशी मागणीही करण्यात आल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी फुरसुंगी पोलिसांनी संस्थाचालक बालाजी मुस्कवाड यांच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला असून, सुसाईड नोटमधील आरोप आणि संस्थेतील कथित गैरप्रकारांची सखोल चौकशी सुरू केली आहे. या घटनेमुळे मृत कर्मचाऱ्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, प्रकरणाच्या तपासाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


