Pandharpur News : आषाढी वारीपूर्वी श्री विठ्ठल-रुक्मिणी भक्तांसाठी एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. स्वयंभू विठ्ठल आणि रुक्मिणी मातांच्या मूर्तींचे जतन व संवर्धन करण्यासाठी २३ आणि २४ जून रोजी मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे.
मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, भारतीय पुरातत्त्व विभागाच्या पाहणीत विठ्ठल मूर्तीमध्ये काही प्रमाणात नैसर्गिक झीज झाल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली मूर्ती संवर्धनाचे काम करण्यात येणार आहे.
जिल्हाधिकारी एस. कार्तिकयन यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत भारतीय पुरातत्त्व विभाग आणि मूर्ती संवर्धन तज्ज्ञांनी या प्रक्रियेचा आराखडा निश्चित केला. त्यानुसार २२ ते २४ जूनदरम्यान मूर्तींच्या जतन, दुरुस्ती आणि संरक्षक आवरण देण्याचे काम केले जाणार आहे.
पाच वर्षांनंतर पुन्हा संवर्धन
यापूर्वी १९८८, २००५, २०१२ आणि २०२० मध्ये विठ्ठल-रुक्मिणी मूर्तींचे संवर्धन करण्यात आले होते. मागील संवर्धनानंतर पाच वर्षांचा कालावधी पूर्ण झाल्याने मूर्तीवरील सूक्ष्म झीज आणि छिद्रांची दुरुस्ती आवश्यक असल्याचे तज्ज्ञांनी नमूद केले आहे.
या संवर्धन प्रक्रियेत भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभाग आणि राज्य पुरातत्त्व विभागाचे मार्गदर्शन असणार असून, वारकरी संप्रदायातील महाराज मंडळींच्या सूचनेनुसार काही सेंद्रिय (ऑरगॅनिक) पद्धतींचाही वापर केला जाणार आहे.
आषाढी एकादशीपूर्वी विठ्ठल-रुक्मिणी मूर्ती अधिक सुरक्षित आणि संरक्षित राहाव्यात, यासाठी हे संवर्धन अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे. त्यामुळे २३ आणि २४ जून रोजी दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनी आपल्या प्रवासाचे नियोजन त्यानुसार करावे, असे आवाहन मंदिर समितीकडून करण्यात आले आहे.


