Rajgad Bee Attack: पुण्यामधून एक मोठी बातमी समोर आली आहे. पुण्याच्या राजगड तालुक्यातील विहीर गावात अखंड हरिनाम सप्ताहानिमित्त आयोजित पालखी सोहळ्यावर अचानक मधमाश्यांनी हल्ला केल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात मधमाशांनी चावा घेतल्याने ६५ हून अधिक ग्रामस्थ जखमी झाले. सर्व जखमींवर राजगडमधील वेल्हे येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले. या धक्कादायक घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
पालखी सोहळ्यावेळी मधमाश्यांचा हल्ला
याबाबत सविस्तर माहिती अशी की, राजगड तालुक्यातील विहीर गावात अखंड हरिनाम सप्ताह सुरु होता. शुक्रवारी या अखंड हरिनाम सप्ताहाचा सांगता समारंभ सुरू होता. त्यानिमित्त ज्ञानेश्वर माऊलींच्या प्रतिमेची पालखी मिरवणूक काढण्यात आली होती. या सप्ताह सोहळ्यासाठी आणि पालखीच्या दर्शनासाठी आसपासच्या भागातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.
विठुनामाच्या गजरात ही पालखीची मिरवणूक सुरु होती. अशातच पालखी मंदिराजवळ आल्यानंतर ती जमिनीवर ठेवताच अचानक मधमाशांनी उपस्थितांवर हल्ला चढवला. अचानक झालेल्या या हल्ल्याने नागरिकांची एकच तारांबळ उडाली. लोक वाट मिळेल तिकडे सैरावैरा धावू लागले. काहींनी मंदिरात आश्रय घेतला तर काहींनी जवळच्या घरांमध्ये धाव घेत स्वतःचा बचाव केला
65 जण जखमी, फटाक्यामुळे हल्ला केल्याचा अंदाज
या घटनेमध्ये २३ महिला, ३० पुरुष आणि १२ लहान मुलांसह एकूण ६५ हून अधिक जणांचा मधमाशांनी चावा घेतला आहे. मधमाध्यांच्या हल्ल्यात जखमी झालेल्यांवर राजगडमधील वेल्हे येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले. सर्वांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, पालखी सोहळ्यादरम्यान काही जणांनी फटाके वाजवल्याने मधमाशा भडकून हा हल्ला झाल्याचा प्राथमिक अंदाज स्थानिकांनी व्यक्त केला आहे.


