Manoj Jarange : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून आंदोलनकर्ते मनोज जरांगे पुन्हा एकदा आक्रमक झाले असून त्यांनी 30 मेपासून उपोषण सुरू करणार असल्याची घोषणा केली आहे. अंतरवाली सराटी येथे झालेल्या बैठकीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना सरकारवर तीव्र शब्दांत निशाणा साधला.
जरांगे पाटील यांनी सांगितले की, मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी गेल्या तीन वर्षांपासून लढा सुरू आहे. काही निर्णय झाले असले तरी अजूनही महत्त्वाचे मुद्दे प्रलंबित असल्याचे त्यांनी म्हटले. “हैदराबाद गॅझेट लागू झाले असे सांगितले जात असताना प्रमाणपत्र का रोखले जात आहे?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
त्यांनी पुढे सांगितले की, सरकारने मराठा समाजाच्या मागण्यांकडे गांभीर्याने पाहिले पाहिजे. 1994 च्या जीआरप्रमाणे हैदराबाद, सातारा, पुणे आणि औंध गॅझेट लागू करण्याची मागणी त्यांनी पुन्हा एकदा केली. तसेच 28 मे रोजी राज्यातील अभ्यासकांना अंतरवाली सराटीत चर्चेसाठी बोलावल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
जरांगे पाटील यांनी उपोषणाची तारीख जाहीर करत सरकारला थेट इशारा दिला असून, आता राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


