छत्रपती संभाजीनगर : कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आक्रमक भूमिका घेत समृद्धी महामार्गावर आंदोलन छेडले. आमदार अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी जांबरगाव इंटरचेंज येथे महामार्ग रोखत सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
कांद्याच्या दरावरून शेतकऱ्यांमध्ये संताप
राज्यात कांद्याला अत्यंत कमी भाव मिळाल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत. काही ठिकाणी कांद्याला अवघा १ रुपये प्रतिकिलो दर मिळाल्याने शेतकऱ्यांना माल विकतानाच खिशातून पैसे मोजावे लागल्याची परिस्थिती निर्माण झाली होती.
यानंतर सरकारने १२ रुपये प्रतिकिलो दराने कांदा खरेदी करण्याचा निर्णय घेतला असला तरी, त्याआधीच अनेक शेतकऱ्यांनी कांदा रस्त्यावर फेकून दिला होता.
समृद्धी महामार्गावर टायर जाळून निषेध
आंदोलनादरम्यान शिवसैनिकांनी महामार्गावर टायर जाळत सरकारविरोधात संताप व्यक्त केला. आंदोलक आणि शेतकऱ्यांनी गळ्यात कांद्याच्या माळा घालत निषेध नोंदवला.
या आंदोलनामुळे काही काळ समृद्धी महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलिसांनी हस्तक्षेप करत आंदोलकांना ताब्यात घेतल्यानंतर वाहतूक पुन्हा सुरू करण्यात आली.
“शेतकऱ्यांच्या डोळ्यातील पाणी सरकारला दाखवणार”
यावेळी अंबादास दानवे यांनी सरकारवर जोरदार टीका करत, “कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या डोळ्यातील पाणी सरकारला दाखवून दिल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही,” असा इशारा दिला.
ठाकरे गटाच्या प्रमुख मागण्या
- नाफेडमार्फत तात्काळ कांदा खरेदी सुरू करावी
- कांद्याला किमान २ हजार रुपये हमीभाव द्यावा
- शेतकऱ्यांना १५०० रुपये अनुदान द्यावे
- कांदा निर्यात कायमस्वरूपी खुली ठेवावी
- खत अनुदान थेट खात्यात जमा करावे
- कांदा चाळीसाठी ७५ टक्के अनुदान आणि स्वस्त दरात दर्जेदार बियाणे उपलब्ध करून द्यावे
दानवेंची आक्रमक भूमिका चर्चेत
महाविकास आघाडीतील इतर पक्ष शांत असताना अंबादास दानवे यांनी पुन्हा आक्रमक पवित्रा घेत शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आंदोलन उभारल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.


