चला, झाले ना मनासारखे. पाकिस्तान स्पर्धत खेळणार हे जितके अधोरेखित होते, तितकेच भारताने हा सामना मोठ्या फरकाने जिंकणे आणि उपांत्य फेरीचा मार्ग आखणे हे देखिल अधोरेखित होते. यात दोन गोष्टी आहेत. एक म्हणजे सहयजमान श्रीलंका, स्पर्धेचे मध्यावर्ती आकर्षण पाकिस्तान हे दोन्ही संघ आव्हान गमावून बसल्यानंतर भारताचेही आव्हान उपांत्य फेरीपूर्वी संपुष्टात येणे हे परवडणारे नव्हते. असे झाले असते, तर विश्वचषक स्पर्धेचे सारे अर्थकारण बदलून गेले असते. दुसरी गोष्ट म्हणजे परिस्थिती अशी गळ्यापर्यंत आणून मग त्यातून बाहेर पडणे याची आता भारतीय खेळाडूंना सवय झाली आहे आणि हळू हळू चाहत्यांना देखिल होत आहे. त्यामुळे ज्यांनी भारतीय क्रिकेट सुरुवातीपासून पाहिले आहे त्यांना ही परिस्थिती किंवा त्याविषयीची चर्चा नवी नव्हती. टी २०च्या रुपाने नवे चाहते बनलेल्यांना या विजयाचे अप्रूप असल्यास चूक काहीच नाही.
हरणे पण हरता हरता रंगत आणणे याची उत्तम उदाहरणे म्हणजे आजचे सामने होते. वेस्ट इंडिज संघाने अगदीच सहज दक्षिण आफ्रिकेला सामना बहाल केला. अर्थात, पूर्ण दहा षटके फलंदाजी होईल की नाही अशी शंका असताना ६ बाद ७३ वरून वेस्ट इंडिजने पूर्ण वीस षटके खेळून १७९ धावांची मजल मारणे ही निश्चित टी २० क्रिकेटची मानसिकता नाही. काही तरी चुकतंय खरं, पण सांगता येत नाही. वेस्ट इंडिजच्या अखेरच्या फलंदाजांनी बिनधास्त फलंदाजी केली. पण, तोच बिनधास्तपणा विंडीजच्या आघाडीच्या फळीने दाखवला नाही. तो दाखवला असता, तर नक्कीच सामना अधिक रंगला असता. दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी अक्षरशः आधाशासाऱख्या धावा करुन झटपट विजय मिळविला. आता विंडीजला आपले आस्तित्व टिकविण्यासाठी अखेरचा सामना भारताविरुद्ध खेळायचा आहे आणि या सामन्यातही फार काही वेगळा निकाल लागणार नाही हे ही तितकेच खरे.
या सामन्याच्या निकालामुळे एक नक्की झाले की भारतीय चाहत्यांनी मोकळा श्वास घेतला. अनेकांनी पाण्यात काढलेले देव बाहेर काढले असतील. भारताने झिम्बाब्वेवर मोठा विजय मिळविल्यानंतरही असे का बरे लिहिता असे वाटत असेल. कारण हे खरे आहे. दक्षिण आफ्रिका संघाचा विजय भारताच्या पथ्यावर पडला आहे. आता भारत आणि वेस्ट इंडिज संघा दरम्यान होणाऱ्या अखेरच्या लढतीला महत्व आले आहे. बघा, तुम्हीच विचार करा आणि आडाखे बांधायला शिका. हा सामनाही असा अखेरचा ठेवला की त्या सामन्याविषयीची उत्कंठा कायम राहणार आहे. भारताने झिम्बाब्वेविरुद्ध का होईना पण फलंदाजीचा सराव करुन घेतला. भारताच्या प्रत्येक फलंदाजांने धावा केल्या. अर्थात, एकालाही मोठी खेळी करता आली नाही हे दुर्दैव ! विक्रमांचे इमले रचून भारत हा विजय साकारणार असे वाटत होते. प्रत्यक्षात वेगळेच चित्र दिसले. भारताने प्रथम फलंदाजीची संधी मिळाल्या नंतर षटकामागे अकरा बाराची धावगती राखली होती. पण, त्यांना विक्रमी धावसंख्या उभी करण्यात अपयश आले.
झिम्बाब्वे संघालाही त्यांना पूर्ण रोखता आले नाही. ब्रेनेट या सलामीच्या जोडीने भारतीय गोलंदाजांमधील त्रुटी दाखवून दिल्या. यावर आता संघ व्यवस्थापन नक्कीच वलिचार करेल. आतापर्यंत फलंदाजांचे अपयश गोलंदाजी धुवून काढल्याचे बोलले जात होते. पण, आज फलंदाजीच्या बरोबरीने गोलंदाजीच्याही त्रुटी समोर आल्या. ब्रेनेट आणि सिंकदर रझा यांनी भारतीय गोलंदाजीचा आत्मविश्वासाने समाचार घेतला. प्रतिस्पर्धी फलंदाजाना इतके सहज समजून गोलंदाजी होणार असेल, तर ती निश्चित परवडणारी नाही. आजच्या दोन सामन्यातला फरक इतकाच होता की विंडीजने आव्हान कायम असूनही काहीच धडपड केली नाही, तर दुसरीकडे झिम्बाब्वेने अशक्यप्राय आव्हानाचा निडरपणे सामना केला. झिम्बाब्वे या सामन्यात जरुर अपयशी झाले असेल, पण हा अनुभव त्यांना निश्चित फायद्याचा ठरेल. पुढील विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत ते अधिक तयारीने आव्हानांना सामोरे जातील. झिम्बाब्वे आणि सहयोगी देशातील क्रिकेट कसे वाढेल आणि त्यांचे स्वतःचे खेळाडू कसे तयार होतील याकडे आता आयसीसीने जातीने लक्ष घालण्याची गरज आली आहे. तरच, क्रिकेट वाढणार आहे…अन्यथा मर्यादा वाढत जातील.


