नवी दिल्ली: पाकिस्तानची काळी गुपिते हळूहळू उघड होत आहेत. पीसीबीचे अध्यक्ष मोहसीन नक्वी यांनी पाकिस्तान सुपर लीगसाठी अनेक परदेशी खेळाडूंचे जीव धोक्यात घातले होते. बांगलादेशी गोलंदाज रिशाद हुसेनने आधीच हे उघड केले आहे. आता असाच एक धक्कादायक खुलासा ऑस्ट्रेलियन मीडियाने केला आहे. खरं तर, तणाव आणि हल्ल्यांदरम्यान पाकिस्तानी सैन्याने ४ ऑस्ट्रेलियन खेळाडूंना दुबईला पाठवण्यासाठी लष्करी हवाई तळाचा वापर केला. ज्या एअरबेसवरून संबंधित विमानाने उड्डाण केले होते, त्या एअरबेसवर काही तासांनी क्षेपणास्त्र हल्ला झाला. या परिस्थितीत त्यांचा जीव थोडक्यात वाचला. भारतीय लष्कराने आधीच सांगितले केले होते की, पाकिस्तानने आपले हवाई क्षेत्र बंद केले नव्हते आणि ते नागरी विमान कंपन्यांचा ढाल म्हणून वापर करत होते.
खेळाडूंना त्यांच्या किट बॅग्ज सोडण्यास भाग पाडले गेले
ऑस्ट्रेलियन वृत्तपत्र सिडनी मॉर्निंग हेराल्डनुसार, शॉन अॅबॉट, बेन द्वारशीस, अॅश्टन टर्नर आणि मिशेल ओवेन यांना नूर खान एअरबेसवरून चार्टर विमानाने दुबईला नेण्यात आले. त्यानंतर अवघ्या ४ तासांतच या एअरबेसला लक्ष्य करण्यात आले. खेळाडूंना त्यांचे सामान आणि किट बॅग्ज तिथेच सोडण्यास भाग पाडण्यात आल्याचेही अहवालात म्हटले आहे. अशाप्रकारे, पाकिस्तानने या चारही खेळाडूंचे जीव धोक्यात घालण्यात कोणतीही कसर सोडली नाही.
डेव्हिड वॉर्नर आधीच ऑस्ट्रेलियाला परतला होता. तो या विमानात नव्हता, पण पाकिस्तानी सैन्याच्या या चुकीमुळे अनेक ऑस्ट्रेलियन खेळाडूंना धक्का बसला. अॅबॉट आणि द्वारशीचे व्यवस्थापक पीटर लोविट म्हणाले, “शॉन आणि बेन दुबईमध्ये असल्याने त्यांना दिलासा मिळाला आहे. गेले २४ तास सर्व खेळाडूंसाठी शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या आव्हानात्मक होते. पुढील पाऊल म्हणजे त्यांना लवकरात लवकर सुरक्षितपणे घरी पोहोचवणे.”
‘या’ खेळाडूंसोबतही असाच एक प्रकार घडला
बांगलादेशी लेग स्पिनर रिशाद हुसेन यांनी खुलासा केला होता की, परदेशी खेळाडू विमानात चढल्यानंतर अवघ्या २० मिनिटांत विमानतळावर क्षेपणास्त्र हल्ला झाला होता. अशाप्रकारे, त्यांनी पाकिस्तानी सैन्याच्या आणखी एका घृणास्पद कृत्याचा पर्दाफाश केला. एवढेच नाही तर पीसीबीचे अध्यक्ष मोहसीन नक्वी यांनी परदेशी खेळाडूंची बैठक बोलावली होती. या काळात, त्यांनी एक दिवस आधी झालेल्या ड्रोन हल्ल्याची बाब त्यांच्यापासून लपवून ठेवली. ते परदेशी खेळाडूंचे जीव धोक्यात घालून उर्वरित सामने कराचीमध्ये आयोजित करण्याचा आग्रह धरत होते, परंतु कोणताही खेळाडू सहमत झाला नाही. सर्वजण दुबईला जाण्यावर ठाम राहिले. त्यानंतरच त्यांनी आपला निर्णय बदलला.


