Bacchu Kadu : विधान परिषद निवडणूक 2026 च्या पार्श्वभूमीवर प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांनी आपली भूमिका स्पष्ट करत राजकीय चर्चांना उधाण आणले आहे. पदासाठी युती करणारा आपण नाही, तर मुद्द्यांसाठी लढणारा नेता असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले.
मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत बच्चू कडू म्हणाले, “विधानपरिषदेचा फॉर्म माझ्या बॅगेत आहे. संधी दिली तर एकनाथ शिंदेंचा पाईक म्हणून काम करेन, पण आमच्यासाठी दिव्यांग, शेतकरी आणि मजूर हेच सर्वात महत्त्वाचे आहेत.”
शिवसेनेकडून विधान परिषदेसाठी त्यांच्या नावाची चर्चा सुरू होती. मात्र त्यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे विलिनीकरण करण्याची अट घालण्यात आल्याच्या चर्चांवर त्यांनी नाराजी व्यक्त केली. “विलिनीकरणाच्या चर्चा ऐकून वाईट वाटलं. या सगळ्या बातम्या फक्त चर्चांमधून तयार झालेल्या आहेत,” असे ते म्हणाले.
बच्चू कडूंनी 1999 मध्ये प्रहार जनशक्ती पक्षाची स्थापना केली. एकनाथ शिंदे यांच्या बंडावेळी त्यांनी साथ दिली होती, मात्र 2024 च्या निवडणुकीत त्यांनी वेगळा मार्ग स्वीकारला. त्या निवडणुकीत पक्षाने 38 जागा लढवल्या, मात्र सर्व ठिकाणी पराभव झाला.
दरम्यान, विधान परिषद निवडणुकीत भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यातील समीकरणे स्पष्ट होत असून संख्याबळानुसार महायुतीचे उमेदवार सहज विजयी होण्याची शक्यता आहे. एक आमदार निवडून येण्यासाठी 28 मतांचा कोटा आवश्यक आहे.
निवडणुकीचा कार्यक्रमही जाहीर झाला असून 12 मे रोजी मतदान होणार आहे, तर त्याच दिवशी संध्याकाळी मतमोजणी होणार आहे. त्यामुळे आता राजकीय हालचालींना अधिक वेग येण्याची चिन्हे आहेत.


