Manoj Jarange Patil: मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील आज कोल्हापूर दौऱ्यावर असून त्यांनी करवीरनिवासिनी श्री अंबाबाई देवीचे दर्शन घेतले. ‘बळीराजा सुखी होऊ दे आणि राज्यात लवकरात लवकर चांगला पाऊस पडू दे,’ असे साकडे त्यांनी देवीच्या चरणी घातले. दर्शनानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी आरक्षणाच्या लढ्यावर भाष्य केले. “मी या मातीतील गरिबाचे लेकरू असून अत्यंत प्रामाणिकपणे ही लढाई लढत आहे. राज्यातील एकाही मराठा बांधवाला आरक्षणापासून वंचित ठेवणार नाही; सर्वांना न्याय मिळेपर्यंत मी स्वस्थ बसणार नाही,” असा स्पष्ट शब्द त्यांनी यावेळी दिला.
गॅझेटच्या अंमलबजावणीसाठी टप्प्याटप्प्याने रणनीती
आरक्षणाच्या कायदेशीर प्रक्रियेवर बोलताना जरांगे पाटील म्हणाले की, बॉम्बे, सातारा, कोल्हापूर, मिरज, औंध आणि पुणे संस्थानच्या गॅझेटचा समावेश झालाच पाहिजे, या मागणीवर आम्ही ठाम आहोत. आता हैद्राबाद गॅझेटनंतर सातारा संस्थानाच्या गॅझेटवर काम सुरू आहे. कोणताही मोठा निर्णय एका रात्रीत होत नसतो; त्यात अनेक कायदेशीर अडचणी, संकटे आणि काही विघ्नसंतोषी लोकांचे अडथळे येतात. मात्र, आपण धैर्याने आणि योग्य रणनीतीने टप्प्याटप्प्याने पुढे जात असून, आपले अंतिम ध्येय नक्कीच गाठू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. छत्रपती शाहू महाराज यांची भेट घेऊन या ऐतिहासिक गॅझेट्सबाबत पुढील दिशा ठरवणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
सरकारच्या कार्यपद्धतीवर अंशतः विश्वास पण…
इतिहास साक्षी आहे की, आजवरच्या सरकारांनी मराठा समाजाची नेहमीच फसवणूक केली आहे, हे त्रिकालाबाधित सत्य आहे, असा टोला लगावत जरांगे पाटील यांनी सध्याच्या प्रक्रियेवर समाधान व्यक्त केले. न्यायमूर्ती शिंदे समितीला मिळालेली मुदतवाढ, ५८ लाख कुणबी नोंदींच्या प्रमाणपत्रांचे वाटप आणि हैद्राबाद गॅझेटनुसार जाहीर झालेली ‘एसओपी’ या सकारात्मक बाबी आहेत. सरकारने आता योग्य पावले उचलण्यास सुरुवात केल्यामुळे या प्रक्रियेवर थोडा विश्वास बसू लागला आहे, असे सांगत त्यांनी सरकारला गॅझेटबाबत सद्बुद्धी लाभो, अशी प्रार्थनाही केली.
रोहित पवारांच्या आंदोलनाला पाठिंबा आणि भेट
आपल्या दौऱ्यादरम्यान मनोज जरांगे पाटील यांनी पंढरपूर येथे जाऊन आमदार रोहित पवार यांची भेट घेतली होती. रोहित पवार हे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावर आमरण उपोषणाला बसले होते. जरांगे पाटील यांच्या भेटीनंतर आणि सकारात्मक चर्चेनंतर रोहित पवार यांनी आपले आंदोलन मागे घेतले. या घडामोडीचा उल्लेख करत जरांगे पाटील यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरही आपली संवेदनशीलता व्यक्त केली.


