मुंबई : विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजप आणि सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली आहे. अमरावती विधान परिषद निवडणुकीत भाजपने दिलेल्या उमेदवारामुळे पक्षातच नाराजी असल्याचा दावा करत, त्यामुळे भाजपची मतं फुटू शकतात, असे ते म्हणाले.
निवडणुकांमध्ये सत्ताधाऱ्यांकडून “पैसा फेक, तमाशा देख” पद्धतीने राजकारण सुरू असल्याचा आरोपही सपकाळ यांनी केला. विरोधी उमेदवारांवर दबाव टाकणे, अर्ज मागे घेण्यास भाग पाडणे आणि मतदारांना प्रभावित करण्यासाठी विविध मार्गांचा वापर केल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेसच्या काँग्रेसमध्ये विलिनीकरणाच्या चर्चांवर भाष्य करताना सपकाळ म्हणाले की, भाजपविरोधात देशात काँग्रेस हाच प्रमुख पर्याय असून पंतप्रधान नरेंद्र मोदींना राजकीय आव्हान देण्यासाठी राहुल गांधी हेच सक्षम नेतृत्व आहे. त्यामुळे विरोधी पक्षांच्या एकत्रीकरणाबाबत चर्चा सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
काँग्रेसमधील अंतर्गत नाराजी आणि वरिष्ठांकडे तक्रारी झाल्याच्या चर्चांनाही त्यांनी फेटाळून लावले. अशा अफवा जाणीवपूर्वक पसरवल्या जात असून त्यामागे भाजपचा हात असू शकतो, असा आरोप करत काँग्रेसच्या आंदोलनांना मिळणाऱ्या प्रतिसादामुळेच अशा चर्चा रंगवल्या जात असल्याचे त्यांनी म्हटले.


