Gopichand Padalkar : पंढरपूर येथे सुरू असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे आमदार रोहित पवार यांच्या अन्नत्याग आंदोलनावर भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी जोरदार टीका केली आहे. रोहित पवार यांचे आंदोलन हे केवळ प्रसिद्धीसाठीचे नाटक असल्याचा आरोप करत त्यांनी उपरोधिक शब्दांत हल्लाबोल केला.
सांगली येथे माध्यमांशी बोलताना पडळकर म्हणाले की, रोहित पवारांना अभिनय चांगला जमत असल्याने त्यांचे आंदोलनही नाटकासारखे वाटते. शेतकऱ्यांना साखर कारखान्यांकडून एफआरपीची संपूर्ण रक्कम मिळेपर्यंत त्यांनी उपोषण सुरूच ठेवावे, असे आव्हान त्यांनी दिले.
यावेळी पडळकर यांनी सोलापूर पोलिसांनाही उपरोधिक सल्ला दिला. रोहित पवार यांच्या आंदोलनस्थळी कडक सुरक्षा ठेवावी आणि त्यांना अन्नाचा एक घासही मिळू देऊ नये, असे ते म्हणाले. शेतकऱ्यांचे प्रश्न सुटेपर्यंत त्यांनी एक-दोन महिने उपोषणावर बसावे, अशी टीकाही त्यांनी केली.
तसेच रोहित पवार आणि त्यांच्या कुटुंबीयांवर निशाणा साधताना, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे सर्वाधिक नुकसान याच मंडळींनी केल्याचा आरोप पडळकर यांनी केला.
दरम्यान, राज्य सरकारने जाहीर केलेल्या दोन लाख रुपयांपर्यंतच्या कर्जमाफीतील काही अटी रद्द करून सरसकट कर्जमाफी द्यावी, या मागणीसाठी रोहित पवार यांनी पंढरपूरमध्ये अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनावरून राज्यातील राजकारण चांगलेच तापले असून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.


