पालघर : पालघर जिल्ह्यातील शिरसाड-वज्रेश्वरी मार्गावर झालेल्या भीषण अपघातात ज्येष्ठ शिवसैनिक आणि वीटभट्टी व्यावसायिक रवींद्र गोपाळ पाटील (वय ५७) यांचा जागीच मृत्यू झाला. शुक्रवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास शिरसाड नाक्याजवळ ही दुर्दैवी घटना घडली. या अपघातामुळे परिसरात शोककळा पसरली असून स्थानिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पारोळ येथील रहिवासी असलेले रवींद्र पाटील हे दुचाकीवरून चांदीप येथील बँकेतून शिरसाडच्या दिशेने जात होते. यावेळी मागून येणाऱ्या हायवा ट्रकने अचानक डावीकडे वळण घेतल्याने त्यांच्या दुचाकीचा तोल गेला आणि ती थेट ट्रकच्या मागील चाकाखाली गेली. अपघात इतका भीषण होता की पाटील यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच मांडवी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आणि वाहतूक सुरळीत केली. मृतदेह शवविच्छेदनासाठी सरकारी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. पोलिसांनी ट्रक चालकाला ताब्यात घेत त्याच्याविरुद्ध निष्काळजीपणे वाहन चालवून मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान, या घटनेनंतर स्थानिक नागरिक, ग्रामस्थ आणि शिवसैनिकांनी संताप व्यक्त केला आहे. या मार्गावर क्षमतेपेक्षा जास्त रेती आणि खडी वाहून नेणाऱ्या हायवा वाहनांवर प्रशासन आणि आरटीओकडून प्रभावी कारवाई होत नसल्याचा आरोप करण्यात येत असून वाहतूक सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.


