Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. नागपूर जिल्ह्यातील 1 लाखांहून अधिक महिला या योजनेसाठी अपात्र ठरण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत असून, त्यांना पुढील हप्त्यांचा लाभ मिळणार नसल्याचे संकेत प्रशासनाकडून देण्यात आले आहेत.
राज्य सरकारने योजनेचा लाभ घेणाऱ्या सर्व महिलांसाठी ई-केवायसी (e-KYC) प्रक्रिया अनिवार्य केली होती. या प्रक्रियेदरम्यान लाभार्थ्यांची पडताळणी करण्यात आली. प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, ई-केवायसीसाठी आता कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नाही.
तपासणीदरम्यान काही महिलांनी चुकीची माहिती देऊन किंवा उत्पन्नाबाबत खोटे दाखले सादर करून योजनेचा लाभ घेतल्याचे आढळून आले आहे. यासाठी शासनाने आयकर विभाग आणि प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या (RTO) माहितीचा आधार घेत पडताळणी केली.
नियमांनुसार ज्या कुटुंबातील सदस्य आयकर भरतात किंवा ज्यांच्या नावावर चारचाकी वाहन आहे, अशा महिलांना या योजनेसाठी अपात्र ठरवण्यात आले आहे. त्यामुळे अशा लाभार्थ्यांची नावे योजनेतून वगळण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
दरम्यान, काही पात्र महिलांना तांत्रिक अडचणींमुळे अद्याप योजनेचा एकही हप्ता मिळालेला नाही. अशा अर्जांची फेरतपासणी केली जाणार असून पात्र आढळणाऱ्या महिलांना लाभ देण्याबाबत विचार केला जाणार आहे.
मात्र, ई-केवायसी पूर्ण न करणाऱ्या किंवा चुकीची माहिती देणाऱ्या लाभार्थ्यांना मे महिन्याचा हप्ताही मिळणार नसल्याचे सांगितले जात आहे. तसेच नियमबाह्य पद्धतीने लाभ घेतल्याचे सिद्ध झाल्यास संबंधितांकडून रकमेची वसुली करण्याची शक्यताही व्यक्त करण्यात येत आहे.


