मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने राज्य प्रशासनात पुन्हा एकदा मोठे फेरबदल करत 12 वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि नियुक्त्यांचे आदेश जारी केले आहेत. या बदल्यांमध्ये सिडको, एमएमआरडीए, धारावी पुनर्विकास प्रकल्प, एमआयडीसी, बृहन्मुंबई महानगरपालिका तसेच विविध जिल्हा परिषदांतील महत्त्वाच्या पदांचा समावेश आहे.
मंत्रिमंडळ बैठकीनंतर अवघ्या काही तासांत हे आदेश जारी करण्यात आल्याने प्रशासकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. महायुती सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळात वरिष्ठ आयएएस आणि आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांची मालिका सुरूच असल्याचे दिसून येत आहे.
या फेरबदलांनुसार, मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त महानगर आयुक्त डॉ. अश्विनी जोशी यांची मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (MMRDA) येथे अतिरिक्त महानगर आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या जागी प्राजक्ता वर्मा यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
सिडकोचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांची धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी विशेष कर्तव्य अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर अश्विन मुदगल यांच्याकडे सिडकोच्या उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
राज्य सरकारने वेलारसू यांची एमआयडीसीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावरून बदली करून त्यांच्याकडे महसूल व वन विभागातील सचिव (वन) पदाची जबाबदारी दिली आहे. त्यांच्या जागी दीपेंद्रसिंग कुशवाह यांची एमआयडीसीच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
याशिवाय डॉ. कादंबरी बलकवडे यांची विकास आयुक्त (उद्योग) म्हणून नियुक्ती करण्यात आली असून संजय काटकर यांच्याकडे कुटुंब कल्याण आयुक्त तसेच राष्ट्रीय आरोग्य अभियान संचालकपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
जिल्हा परिषद स्तरावरही महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. जेनिथ चंद्रा डोनथुला यांची गोंदिया जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी, तर अनय नावंदर यांची अकोला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
तसेच डॉ. बी. सरावनन यांची नांदेड येथील आयटीडीपी प्रकल्प अधिकारी व सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली असून लघिमा तिवारी यांची नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा आयटीडीपी प्रकल्प अधिकारी व सहाय्यक जिल्हाधिकारीपदी बदली करण्यात आली आहे.


