Raigad NCP Banner: राष्ट्रवादी काँग्रेसच्या बॅनरवरून दिवंगत नेते अजित पवार (Ajit Pawar), पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवारांचाच फोटो गायब झाल्याचं रायगडमध्ये दिसून आलं. राज्याच्या मंत्री आदिती तटकरे (Aditi Tatkare) यांच्या मतदारसंघातील एका कार्यक्रमाच्या बॅनरवर या दोन्ही नेत्यांचे फोटो गायब झाले. त्याचवेळी त्या बॅनरवर सुनील तटकरे, आदिती तटकरे आणि अनिकेत तटकरे यांचे फोटो मात्र दिसून आले. या कार्यक्रमाला स्वतः खासदार सुनील तटकरे (Sunil Tatkare) उपस्थित असल्याने आता त्याची जोरदार चर्चा सुरू आहे.
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांच्यावर राष्ट्रवादी पक्ष फोडल्याचा आरोप आरोप होत असताना रायगडमध्ये पक्षाच्या कार्यक्रमांच्या बॅनरवरून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, स्वर्गीय अजित पवार यांच्यासह पक्षश्रेष्टींचे फोटो बेपत्ता झाल्याचे समोर आलं आहे.
मंत्री आदिती तटकरेंच्या मतदारसंघातील नवनिर्वाचित जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्यांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता. यावेळी व्यासपीठावरील बॅनरवर खासदार सुनिल तटकरे, मंत्री आदिती तटकरे, माजी आमदार अनिकेत तटकरे यांच्यासह स्थानिक नेत्यांचे फोटो लावण्यात आले होते. मात्र या बॅनरवर स्वर्गीय अजित पवार, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह पक्षश्रेष्टींचे फोटो लावण्यात आले नाहीत. रायगडमध्ये राष्ट्रवादीच्या बॅनरवरून पक्षश्रेष्टी बेपत्ता होत असल्याने राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरु झाल्या आहेत.
अजित दादांचा #NCP पक्ष ताब्यात घेण्याचे आधीपासूनचेच मनसुबे लपवून राहिलेले नाहीत. त्याची सुरुवात रायगड पासून झाली आहे. आदरणीय अजित दादांचा आणि उपमुख्यमंत्री @SunetraA_Pawar वहिनींचा पक्षाच्या अधिकृत कार्यक्रमात बॅनरवर नाव किंवा फोटो सुद्धा नाही. याला कृतघ्नता म्हणतात. अजित दादांनी… pic.twitter.com/APTA5Txb8m
— Vikas Lawande (@VikasLawande1) March 29, 2026
सुनील तटकरेंवर टीकेची झोड
अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी ताब्यात घेण्याचे सुनील तटकरेंचे प्रयत्न असल्याचा आरोप अनेकदा आमदार रोहित पवार आणि शरद पवारांच्या गटातील नेत्यांनी केला आहे. त्यानंतर आता राष्ट्रवादीच्या बॅनरवरून अजित पवारांचाच फोटो गायब झाल्याचे जोरदार चर्चा सुरू आहे.
या प्रकरणी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी सुनील तटकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. दादांचा पक्ष ताब्यात घेण्याचे तटकरेंचे मनसुबे लपून राहिले नाहीत. त्याची सुरुवात आता रायगडमधून झाली असल्याची टीका लवांडे यांनी केली. तुमच्यात हिंमत असेल तर तुम्ही प्रफुल पटेल यांच्यासोबत वेगळा पक्ष काढावा, किंवा भाजपमध्ये जावं असा टोलाही लवांडे यांनी लगावला.


