मुंबई : महाराष्ट्रात थंडीची लाट जोर धरत असून, राज्यातील बहुतांश भागात किमान तापमानात घसरण होत आहे. भारत हवामान विभागाने (IMD) मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातील ११ जिल्ह्यांसाठी थंडीचा यलो अलर्ट जारी केला आहे. नंदुरबार, धुळे, नाशिक, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड आणि गोंदियात तापमानात आणखी २-३ अंशांची घसरण अपेक्षित असून, पुढील २-३ दिवस हा कडाका कायम राहील. दुसरीकडे, मुंबई-पुणे आणि कोकणातही थंडीची चाहूल लागली असून, नागरिक सकाळी घराबाहेर पडण्यास नमले आहेत.
हवामान विभागाच्या माहितीनुसार, उत्तरेकडील थंड हवेच्या प्रवाहामुळे राज्यभर तापमानात लक्षणीय घसरण होत आहे. मुंबईत किमान तापमान १७ अंश च्या आसपास असले तरी पुण्यात ११ अंश पर्यंत खाली गेले आहे. मराठवाड्यातील परभणी, धुळे आणि नंदुरबारसारख्या भागांत तापमान १० अंशाखाली असून, रब्बी पिकांसाठी ही थंडी फायदेशीर ठरत आहे. मात्र, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी आणि शेतकऱ्यांना या थंडीचा त्रास होत असून, ठिकठिकाणी शेकोट्या पेटल्या आहेत. उबदार कपड्यांच्या विक्रीतही वाढ झाली आहे.
जिल्हानिहाय अपडेट :
- धुळे : रविवारी ८अंश तापमानाची नोंद झाली असून, आजही कडाक्याची थंडी कायम. नागरिक सकाळीच घराबाहेर पडून थंडीचा आनंद घेत आहेत, पण रात्री शेकोट्यांचा आधार घेतला जातोय.
- परभणी : गेल्या आठवड्यापासून १० अंशाखाली तापमान असून, दिवसभर गारवा जाणवतोय. दूध-भाजी विक्रेत्यांना जास्त त्रास होत असून, रब्बी पीक (गहू, हरभरा) साठी ही थंडी पोषक.
- महाबळेश्वर : ‘मिनी काश्मीर’मध्ये तापमान १०.२ अंश पर्यंत खाली गेले असून, वेण्णा लेकवर पर्यटक फिरत आहेत. गार वाऱ्यामुळे स्थानिक आणि पर्यटक स्वेटर-जॅकेट घालून फिरत आहेत. निसर्गरम्य दृश्यांचा आनंद घेण्यासाठी थंडी अनुकूल.
- नंदुरबार : सातपुडा पर्वतरांगेत १२ अंश तापमान नोंदवले असून, सकाळी रस्ते ओस पडले आहेत. रब्बी हंगामाच्या पेरण्यांना वेग आला असून, पुढील दिवसांत तापमान आणखी घसरणार.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार १९ नोव्हेंबरपर्यंत थंडीचा प्रभाव कायम राहील. उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात रात्रीचे तापमान १६-१७अंश पर्यंत खाली जाण्याची शक्यता आहे. नागरिकांना उबदार कपडे, शेकोटी आणि आरोग्यसेवा घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. राजकीय वातावरण तापले तरी हवामानाने राज्याला थंडीचा ‘कडाका’ अनुभवायला लावला आहे!


