Vidhan Parishad Election : महाराष्ट्रातील विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला असून कोणाला संधी मिळणार याबाबत मोठी चर्चा रंगली आहे. 12 मे रोजी होणाऱ्या मतदानासाठी 10 जागा रिक्त आहेत. संख्याबळानुसार भाजपला 6, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला 2, राष्ट्रवादी काँग्रेसला 1 आणि महाविकास आघाडीला 1 जागा मिळणार आहे.
भाजपने आपल्या कोट्यातील सहा उमेदवारांची यादी जाहीर करताना नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे. प्रमोद जठार, संजय भेंडे, माधवी नाईक, विवेक कोल्हे, सुनील कर्जतकर आणि प्रज्ञा सातव यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या निवडीत प्रादेशिक समतोल साधण्याचाही प्रयत्न दिसून येतो.
मात्र, या यादीत विद्यमान आमदार संजय केनेकर यांना स्थान न मिळाल्याने त्यांनी अप्रत्यक्षपणे नाराजी व्यक्त केली आहे. त्यांचा कार्यकाळ 13 मे रोजी संपणार असून त्यांना पुन्हा संधी न दिल्याने त्यांनी व्हॉट्सअॅप स्टेटसद्वारे भावना व्यक्त केल्या.
“विझलो आज जरी मी, हा माझा अंत नाही… पेटेन उद्या नव्याने…” अशा ओळींच्या कवितेतून त्यांनी आपल्या मनातील खंत मांडली.
संजय केनेकर गेल्या 35 वर्षांपासून भाजपमध्ये कार्यरत असून त्यांनी विद्यार्थी परिषदेपासून विविध जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. गेल्या वर्षी मार्चमध्ये त्यांना विधान परिषदेत संधी मिळाली होती. आता उमेदवारी न मिळाल्याने त्यांच्या प्रतिक्रियेची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.


