कोल्हापूर : जिल्ह्यातील जयसिंगपूर येथे एका तरुण दंतचिकित्सकाने राजाराम तलावात उडी घेऊन आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अवधूत मुळे असे या दंतचिकित्सकाचे नाव आहे. त्यांनी आत्महत्येपूर्वी पाठीवरच्या बॅगेत दगड आणि विटा भरले होते. याशिवाय मित्रांना आणि नातेवाईकांना शेवटचा संदेश पाठवला होता. प्राथमिक माहितीनुसार, कौटुंबिक नैराश्यातून त्यांनी हा टोकाचा निर्णय घेतला.
घटनेच्या दिवशी अवधूत दुचाकीने राजाराम तलाव गाठले. तलाव काठावर दुचाकी उभी करून त्यांनी सुसाईड नोट लिहिली आणि नंतर तलावात उडी मारली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला आहे. पोलिसांच्या प्राथमिक तपासात कौटुंबिक समस्या कारणीभूत असल्याचे समोर आले आहे, मात्र सुसाईड नोटमधील तपशील अद्याप उघड झालेला नाही.
या घटनेने मुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. महाराष्ट्रात अलीकडे आत्महत्यांच्या घटना वाढल्या असून, मानसिक तणाव आणि कौटुंबिक समस्या यामुळे असे प्रकार घडत असल्याचे दिसते.


