Mumbai Pune Expressway: विकेंडच्या सुट्ट्या आणि ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाच्या उद्घाटनाच्या हालचालींमुळे मुंबई-पुणे एक्स्प्रेसवे आज पूर्णपणे विस्कळीत झाला आहे. सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे पर्यटकांनी मोठ्या संख्येने घराबाहेर पडणे पसंत केल्याने घाटात वाहनांच्या 5 ते 10 किलोमीटर लांबच लांब रांगा लागल्या आहेत. कडाक्याच्या उन्हात प्रवाशांना तासनतास एकाच जागी ताटकळत राहावे लागत असून, या प्रचंड वाहतूक कोंडीमुळे मुंबई-पुणे प्रवासाचा वेळ दुप्पट झाला आहे.
खंडाळा ते खालापूरपर्यंत ‘ग्रिडलॉक’
वाहतुकीची सर्वात भीषण परिस्थिती खंडाळा बोगदा, अमृतांजन पूल आणि खालापूर टोल नाक्याच्या दरम्यान पाहायला मिळत आहे. येथे वाहतूक इतकी संथ आहे की काही ठिकाणी तासनतास गाड्या एकाच जागी उभ्या आहेत. पर्यटकांच्या गर्दीत भर म्हणून व्हीआयपींच्या हालचाली वाढल्याने ही ‘ग्रिडलॉक’ची स्थिती निर्माण झाली आहे. सलग सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी कोल्हापूर, सातारा आणि महाबळेश्वरकडे निघालेल्या प्रवाशांना घाटातील या अडथळ्याचा मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.
खासदार सुप्रिया सुळेही वाहतूक कोंडीत अडकल्या
या महाभयंकर कोंडीचा फटका केवळ सर्वसामान्यांनाच नाही, तर लोकप्रतिनिधींनाही बसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांना सुमारे 2 तास या वाहतूक कोंडीत अडकून राहावे लागले. त्यांनी सोशल मीडियाद्वारे या त्रासाबाबतची माहिती देत प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. महत्त्वाच्या व्यक्तींच्या प्रवासासाठी लावण्यात आलेले प्रोटोकॉल आणि ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाच्या तयारीमुळे सामान्य प्रवाशांचे हाल होत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
इतर महामार्गांवरही प्रवाशांची दमछाक
केवळ एक्स्प्रेसवेच नाही, तर इतर महत्त्वाच्या मार्गांवरही वाहतुकीची स्थिती बिकट आहे. पुणे-सातारा महामार्गावर खेड शिवापूर टोल नाका ते कात्रज बोगद्यापर्यंत पर्यटकांच्या गाड्यांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. तसेच, मुंबई-गोवा महामार्गावर कोकणाकडे जाणाऱ्या वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे वाहतूक अत्यंत संथ गतीने सुरू आहे. प्रवाशांच्या बेशिस्त ड्रायव्हिंगमुळे आणि रांगा तोडून पुढे जाण्याच्या घाईमुळे अनेक ठिकाणी रस्ते पूर्णपणे ब्लॉक झाले आहेत.
कोंडीची प्रमुख कारणे आणि पोलिसांचे आवाहन
वाहतूक कोंडीमागे ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाच्या उद्घाटनाच्या हालचाली आणि व्हीआयपी प्रोटोकॉल हे मुख्य कारण मानले जात आहे. भविष्यात या प्रकल्पामुळे प्रवास 30 मिनिटांनी कमी होईल, असा दावा केला जात असला तरी, सध्या मात्र प्रवाशांना तासनतास उन्हात उभे राहावे लागत आहे. महामार्ग पोलीस वाहतूक सुरळीत करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करत असून, प्रवाशांना संयम ठेवण्याचे आणि लेन शिस्त पाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


