Missing Link : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील प्रवासाचा सर्वात मोठा ‘ब्लॅक स्पॉट’ असलेल्या बोरघाटाचा चेहरामोहरा आता पूर्णपणे बदलला आहे. अवघ्या १० दिवसांपूर्वी सुरू झालेल्या ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पामुळे प्रवाशांना ऐतिहासिक दिलासा मिळाला असून, एकेकाळी तासन् तास कोंडीत अडकणारा हा मार्ग आता मोकळा श्वास घेत आहे.
घाटातील वाहतुकीचे गणित बदलले
मे महिन्याच्या उन्हाळी सुट्ट्यांमुळे एरवी खंडाळा-लोणावळा घाटात वाहनांच्या ५-६ किलोमीटर लांब रांगा असायच्या. मात्र, आता ७०% हलकी वाहने आता नवीन ‘मिसिंग लिंक’ मार्गाचा वापर करत आहेत. ३०% अवजड वाहने जुन्या घाटातून जात असल्याने तिथली गर्दीही लक्षणीयरीत्या कमी झाली आहे. घाटातील ती वळणे आणि चढ-उतार आता वाहतूक कोंडीपासून मुक्त झाले आहेत.
‘मिसिंग लिंक’मुळे प्रवाशांचे ‘हे’ ५ मोठे फायदे:
- अर्ध्या तासाची बचत: नवीन मार्गामुळे प्रवासाचे अंतर ६ किलोमीटरने घटले आहे, परिणामी प्रवाशांचा २५ ते ३० मिनिटांचा वेळ वाचत आहे.
- अपघातांना लगाम: घाटातील तीव्र उतारांमुळे होणारे भीषण अपघात आता टळले आहेत. विशेष म्हणजे, गेल्या १० दिवसात या नवीन मार्गावर एकही अपघात झालेला नाही.
- आठ पदरी प्रशस्त मार्ग: एक्सप्रेस वे सहा पदरी असला तरी, ‘मिसिंग लिंक’चा ५.६८ किमीचा भाग ८ पदरी आहे. यामुळे वाहने अधिक वेगाने आणि सुरक्षितपणे धावत आहेत.
- इंधन आणि पैशांची बचत: घाटात वाहने थांबून राहणे किंवा चढावर इंधन जास्त लागणे आता बंद झाले आहे. थेट बोगदा आणि पुलावरून प्रवास होत असल्याने गाडीचे एव्हरेज वाढले आहे.
- कोंडीमुक्त सुट्ट्या: विकेंडला लोणावळ्यात होणारी वाहनांची गर्दी आता बायपास झाली असून पर्यटकांचा प्रवास सुसह्य झाला आहे.
७ वर्षांची प्रतीक्षा आणि ६,७०० कोटींचा खर्च
MSRDC ने २०१९ मध्ये सुरू केलेले हे महाकाय काम ७ वर्षांनंतर पूर्ण झाले आहे. खंडाळा-लोणावळा या भागाला पूर्णपणे ‘बायपास’ करणारा हा प्रकल्प सुमारे ६,७०० कोटी रुपये खर्चून उभारण्यात आला आहे. यामुळे मुंबई ते पुणे दरम्यानचे अंतर केवळ वेळेतच नाही, तर किलोमीटरमध्येही कमी झाले असून प्रवाशांचे ‘सुसाट’ प्रवासाचे स्वप्न प्रत्यक्षात आले आहे. थोडक्यात सांगायचे तर ‘मिसिंग लिंक’ हा केवळ रस्ता नसून मुंबई-पुणेकरांसाठी गती, सुरक्षा आणि बचतीचा एक नवा अध्याय ठरत आहे.


