Gondia Tiger Attack: गोंदिया जिल्ह्यात वन्यप्राण्यांच्या हल्ल्यांचे सत्र थांबण्याचे नाव घेत नसून, अर्जुनी-मोरगाव तालुक्यात एका ६५ वर्षीय महिलेचा वाघाच्या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे, २४ तासांत वाघाच्या हल्ल्याची ही दुसरी घटना असल्याने परिसरात प्रचंड संताप आणि भीतीचे वातावरण पसरले आहे.
तेंदूपत्ता संकलनासाठी गेल्या अन् काळ आला…
मिळालेल्या माहितीनुसार, वडेगाव बंध्या येथील रहिवासी कौशल्या हरिदास रहाटे (६५) या रविवारी सकाळी आपल्या सुनेसोबत जंगलात तेंदूपत्ता गोळा करण्यासाठी गेल्या होत्या. केशवोरी नियतक्षेत्रातील कक्ष क्रमांक २८२ मध्ये दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक कौशल्या यांच्यावर जीवघेणा हल्ला चढवला. या झडपेत त्यांचा जागीच मृत्यू झाला. कौशल्या रहाटे या अंगणवाडी केंद्रात मदतनीस म्हणून काम करत होत्या आणि नुकत्याच १ एप्रिल रोजी सेवानिवृत्त झाल्या होत्या. सेवानिवृत्तीनंतर संसाराला हातभार लावण्यासाठी त्या मजुरी करत होत्या, मात्र नियतीला काही वेगळेच मान्य होते.
जिल्ह्यात वन्यप्राण्यांचा धुमाकूळ; तीन महिला जखमी
केवळ वाघच नव्हे, तर रानडुक्कर आणि अस्वलांच्या हल्ल्यांनीही गोंदिया जिल्हा त्रस्त झाला आहे. देवरी तालुक्यात सोमवारी वेगवेगळ्या घटनांत तीन महिला जखमी झाल्या:
- १. रानडुकराचा हल्ला: ओवारा येथील वनमाला बोरकर आणि डोंगरगाव येथील भुमेश्वरी डोये या रानडुकराच्या हल्ल्यात जखमी झाल्या असून त्यांच्यावर गोंदियाच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
- २. अस्वलाचा हल्ला: देवाटोला येथील हिरणबाई वाढिवे यांच्यावर अस्वलाने हल्ला केला, त्यांना आमगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
वनविभागाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
९ मे रोजी बोंडगाव-सुरबन परिसरात अशाच प्रकारे एका महिलेवर वाघाने हल्ला करून तिला गंभीर जखमी केले होते. लागोपाठ होत असलेल्या या घटनांमुळे नागरिकांमध्ये वनविभागाप्रती तीव्र संताप व्यक्त होत आहे. “आम्ही जगायचे कसे?” असा सवाल स्थानिक विचारत असून, वनविभागाने नरभक्षक प्राण्यांचा बंदोबस्त करण्यासाठी तात्काळ ठोस पावले उचलावीत, अशी मागणी ग्रामस्थांनी लावून धरली आहे.


