NEET 2026 paper leak: NEET 2026’ पेपरफुटी प्रकरणातील कथित सूत्रधार पी.व्ही. कुलकर्णी याच्याविरोधात प्रशासनाने आता कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. बीड शहरात परवानगीशिवाय उभारण्यात आलेल्या त्याच्या आलिशान इमारतीवर कोणत्याही क्षणी पाडकाम कारवाई होण्याची शक्यता आहे. बीड नगर परिषदेने संबंधित बांधकामावर नोटीस लावत तीन दिवसांची मुदत दिली होती. ही मुदत संपल्यानंतर आता प्रशासनाने कारवाईची तयारी सुरू केली आहे.
मुख्याधिकाऱ्यांची प्रत्यक्ष पाहणी
नगर परिषदेचे मुख्याधिकारी शैलेश खडसे यांनी स्वतः या अनधिकृत बांधकामाची पाहणी केली. प्राथमिक तपासात या इमारतीसाठी आवश्यक परवानग्या घेण्यात आल्या नसल्याचे समोर आले आहे. तसेच, सार्वजनिक आणि आरक्षित खुल्या जागांवर अतिक्रमण करून हे बांधकाम करण्यात आल्याचा संशयही व्यक्त करण्यात येत आहे. रस्त्यालगत आवश्यक असलेली ‘सेटबॅक’ जागाही सोडण्यात आलेली नसल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे.
‘पेपरफुटी’च्या पैशातून उभारली इमारत?
तपास यंत्रणांच्या माहितीनुसार, पी.व्ही. कुलकर्णी याने ‘NEET’ पेपरफुटी घोटाळ्यातून मिळालेल्या पैशांच्या जोरावर ही भव्य इमारत उभारण्यास सुरुवात केली होती. मात्र, बांधकाम सुरू करण्यापूर्वी नगर परिषदेकडून कोणतीही अधिकृत परवानगी घेण्यात आली नव्हती. त्यामुळे हे बांधकाम पूर्णपणे अनधिकृत असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.
‘NTA’ प्रक्रियेशी थेट संबंध
पी.व्ही. कुलकर्णी हा रसायनशास्त्र विषयाचा निवृत्त प्राध्यापक असून तो ‘नॅशनल टेस्टिंग एजन्सी’च्या (NTA) वतीने ‘NEET’ परीक्षा प्रक्रियेशी संबंधित असल्याची माहिती तपासात समोर आली आहे. ‘CBI’ने त्याला पुण्यातून अटक केली होती. मूळचा लातूरचा असलेल्या कुलकर्णीवर कोचिंग क्लासमधील विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका फोडून प्रश्न आणि उत्तरे पाठ करून घेण्याचा गंभीर आरोप आहे.
‘NEET 2024’ प्रकरणातही सहभागाचा संशय
सूत्रांच्या माहितीनुसार, ‘CBI’ने कुलकर्णीची केवळ ‘NEET 2026’ पेपरफुटीपुरतीच नव्हे, तर ‘NEET 2024’ आणि इतर संबंधित प्रश्नपत्रिका प्रकरणांबाबतही चौकशी केली आहे. त्याने तयार केलेल्या प्रश्नपत्रिकांबाबत तपास यंत्रणांनी सखोल तपास सुरू केला असून, आणखी काही धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी तयार केली एजंटांची साखळी
तपासात आणखी एक महत्त्वाची बाब समोर आली आहे. पी.व्ही. कुलकर्णी आणि मनीषा वाघमारे यांनी पुण्यासह महाराष्ट्रातील विविध भागांतील विद्यार्थ्यांशी संपर्क साधण्यासाठी संघटित जाळे उभारले होते. विद्यार्थ्यांच्या कमकुवत मानसिकतेचा फायदा घेत त्यांना गाठण्यात येत होते. यासाठी विविध शैक्षणिक शाखांतील वरिष्ठ विद्यार्थ्यांची ‘एजंट’ म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. विशेषतः अभियांत्रिकी शाखेतील विद्यार्थ्यांचा या साखळीत मोठ्या प्रमाणावर सहभाग असल्याची माहिती समोर आली आहे.


