Gram Panchayat Elections: कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकांचा बिगुल वाजला असून, तब्बल ४३३ ग्रामपंचायतींसाठी लवकरच निवडणुकीची रणधुमाळी सुरू होणार आहे. आधीच गोकुळ दूध महासंघाच्या राजकारणामुळे जिल्ह्यातील ग्रामीण वातावरण तापले असताना, आता गावपातळीवरील राजकीय समीकरणांनाही वेग येणार असल्याचे चित्र दिसत आहे.
आरक्षण सोडतीचे वेळापत्रक जाहीर
राज्य निवडणूक आयोगाने ग्रामपंचायत निवडणुकांसाठी आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार विशेष ग्रामसभांमधून आरक्षण निश्चित करण्याची प्रक्रिया राबवली जाणार आहे. प्रशासनाच्या माहितीनुसार, १२ जून रोजी आरक्षण सोडत पार पडणार असून त्यानंतर निवडणूक कार्यक्रम अधिकृतरीत्या जाहीर होण्याची शक्यता आहे. ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील स्थानिक नेतृत्व, गटबाजी आणि राजकीय हालचालींना आता अधिक वेग येणार असल्याचे मानले जात आहे.
निवडणूक प्रक्रियेचे महत्त्वाचे टप्पे
निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार, आरक्षण प्रक्रियेसाठी विविध टप्पे निश्चित करण्यात आले आहेत. विशेष ग्रामसभांच्या माध्यमातून आरक्षणाची सोडत तहसीलदारांनी नियुक्त केलेल्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत होणार आहे.
निवडणूक प्रक्रियेचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे आहे:
८ जून – विशेष ग्रामसभा
१२ जून – आरक्षण सोडत
१७ जून – प्रारूप अधिसूचनेस मान्यता
१९ जून – प्रारूप आरक्षण जाहीर
१९ ते २५ जून – हरकती आणि सूचना स्वीकारणे
२३ जुलै – उपविभागीय अधिकाऱ्यांचा अभिप्राय
८ जुलै – अंतिम अधिसूचनेस मान्यता
१० जुलै – अंतिम आरक्षण प्रसिद्ध
गोकुळच्या राजकारणाचा गावागावात प्रभाव
गेल्या काही आठवड्यांपासून गोकुळ दूध महासंघाच्या राजकारणामुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागात वातावरण ढवळून निघाले आहे. अनेक दूध संस्था गोकुळशी जोडलेल्या असल्याने त्याचे पडसाद थेट ग्रामपंचायत निवडणुकांवर उमटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सध्या विविध संस्थांमध्ये ठराव गोळा करण्याची प्रक्रिया सुरू असून, कोणत्या गटाला पाठिंबा द्यायचा यावरून स्थानिक स्तरावर राजकीय चुरस वाढत आहे. त्यातच ग्रामपंचायत निवडणुकांची घोषणा झाल्याने गावागावातील राजकीय वातावरण अधिक तापण्याची चिन्हे आहेत.
स्थानिक नेत्यांसाठी प्रतिष्ठेची लढत
या निवडणुकांकडे केवळ ग्रामपंचायत निवडणूक म्हणून न पाहता आगामी मोठ्या राजकीय समीकरणांची रंगीत तालीम म्हणूनही पाहिले जात आहे. गावपातळीवर प्रभाव निर्माण करण्यासाठी विविध राजकीय गटांनी मोर्चेबांधणी सुरू केली असून, पुढील काही आठवड्यांत जिल्ह्यातील राजकारण आणखी रंगण्याची शक्यता आहे.


