Uddhav Thackeray : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील राजकीय घडामोडींना वेग आला असून, सहा खासदारांनी वेगळी भूमिका घेतल्यानंतर पक्षाला आणखी एक मोठा धक्का बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनीही पक्षापासून अंतर ठेवल्यानंतर आता ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते आणि माजी जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे यांनीही पक्ष सोडण्याचे संकेत दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
उद्धव ठाकरे यांच्या शिर्डी दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर ही घडामोड घडत असल्याने तिचे राजकीय महत्त्व अधिक वाढले आहे. ठाकरे गटाचे जिल्हा संघटक आणि माजी जिल्हाप्रमुख म्हणून काम पाहिलेल्या रावसाहेब खेवरे यांनी स्वतः पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याचे वृत्त समोर आले आहे. तसेच ते लवकरच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश करू शकतात, अशी जोरदार चर्चा सुरू आहे.
महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर उद्धव ठाकरे यांना सातत्याने राजकीय आव्हानांचा सामना करावा लागत आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर पक्ष संघटनेला मोठा धक्का बसला होता. त्यानंतर लोकसभा निवडणुकीनंतर सहा खासदारांनी घेतलेल्या भूमिकेमुळे ठाकरे गटाची चिंता आणखी वाढली आहे. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे विविध मतदारसंघांमध्ये सभा घेऊन पक्ष संघटना मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहेत.
दरम्यान, शिर्डीतील सभेपूर्वीच रावसाहेब खेवरे यांनी वेगळी भूमिका घेतल्याने राजकीय वातावरण तापले आहे. भाऊसाहेब वाकचौरे यांच्या निवडणुकीतील विजयात खेवरे यांची महत्त्वाची भूमिका मानली जात होती. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून ते पक्ष नेतृत्वावर नाराज असल्याच्या चर्चा सुरू होत्या.
राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीच्या वेळी रावसाहेब खेवरे यांनी उमेदवारीसाठी थेट ‘मातोश्री’वर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. मात्र, महाविकास आघाडीतील जागावाटपात हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाकडे गेल्यानंतर त्यांची नाराजी वाढल्याचे बोलले जाते.
यानंतर खेवरे यांनी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवली होती. मात्र, त्यांना अपेक्षित यश मिळाले नाही. त्यानंतर त्यांनी पक्ष नेतृत्वापासून अंतर राखल्याची चर्चा होती. विशेष म्हणजे, खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनीही वेगळी भूमिका घेतली असताना खेवरे यांनी कोणतीही सार्वजनिक प्रतिक्रिया दिली नव्हती.
आता उद्धव ठाकरे यांच्या शिर्डी दौऱ्याच्या दिवशीच रावसाहेब खेवरे यांच्या संभाव्य राजकीय निर्णयाची चर्चा सुरू झाल्याने राज्याच्या राजकारणात नव्या समीकरणांची चर्चा रंगली आहे. उद्धव ठाकरे यांना आणखी एक राजकीय धक्का बसणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


