गोंदिया : गोंदिया जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदात मोठा बदल झाला आहे. राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी तब्येतीच्या कारणास्तव हे पद सोडले असून, आता राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्याकडे ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे. ही घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वरळी येथील जिल्हाध्यक्षांच्या बैठकीत करण्यात आली. या फेरबदलीमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
बाबासाहेब पाटील यांनी मंगळवारी (१४ ऑक्टोबर) अधिकृतपणे पालकमंत्रीपदाचा राजीनामा दिला. काही दिवसांपूर्वीच त्यांच्या गुडघ्याचे ऑपरेशन झाले असून, सतत पायाचा त्रास होत असल्याने लांबचा प्रवास करणे शक्य नसल्याचे कारण त्यांनी सांगितले. पालकमंत्री म्हणून जिल्ह्याला नियमित भेट देणे अपेक्षित असते, पण आरोग्याच्या या समस्या कारणीभूत ठरल्या.
यापूर्वी जानेवारी २०२५ मध्ये मंत्रिमंडळ विस्तारानंतर त्यांना गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून नियुक्त करण्यात आले होते, ज्यामुळे लातूरमधून गोंदियाचा कारभार चालणार असल्याची चर्चा रंगली होती. मात्र, आता या पदाचा त्याग करताना त्यांनी पक्ष नेतृत्वाला निवेदन दिले आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नागपूर शिबिरात खासदार प्रफुल्ल पटेल यांनी विदर्भातील पालकमंत्र्यांवर जोरदार हल्लाबोल केला होता. ते म्हणाले होते, “पालकमंत्री केवळ १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारीला येतात, इतर वेळी जिल्ह्यात हजेरी देत नाहीत. स्थानिक पदाधिकारी आणि नेत्यांना सोबत घेतले जात नाही.” ही टीका बाबासाहेब पाटील यांच्यावरच असल्याचे मानले जात आहे, ज्यामुळे राजकीय दबाव वाढला. याच पार्श्वभूमीवर हा फेरबदल झाल्याची शक्यता व्यक्त होत आहे.
नवीन पालकमंत्री इंद्रनील नाईक हे विदर्भातीलच नेते असून, यंदाच्या मंत्रिमंडळ विस्तारात त्यांना उच्च आणि तांत्रिक शिक्षण, आदिवासी विकास तसेच पर्यटन खाती सोपवण्यात आली आहे. पुसद मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार असलेले नाईक यांना गोंदियाला भेट देणे सोयीस्कर राहील, असे पक्ष नेतृत्वाने स्पष्ट केले.
अजित पवार यांच्या वतीने सांगण्यात आले की, “नाईक यांच्यावर ही जबाबदारी सोपवली आहे, जेणेकरून जिल्ह्याच्या विकासाला गती मिळेल.” गोंदिया जिल्हा नेहमीच बाहेरील पालकमंत्र्यांवर अवलंबून राहिला आहे, आणि चार वर्षांत पाच पालकमंत्री बदलले गेले आहेत, ज्यामुळे स्थानिक नेत्यांमध्ये असंतोष आहे.


