Nagpur Crime : नागपूरमध्ये धक्कादायक घटना घडली असून वर्धा जिल्ह्यातील २४ वर्षीय विवाहित तरुणीची भररस्त्यात चाकूने वार करून निर्घृण हत्या करण्यात आली आहे. घटस्फोटाचा निकाल लागल्यानंतर अवघ्या दुसऱ्याच दिवशी ही घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. जुनी कामठी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हिरणवार गल्ली परिसरात शुक्रवारी सायंकाळी सुमारे ६.३० वाजता हा थरार घडला.
मृत तरुणीचे नाव मंजू संदीप पचारे (वय २४, मूळ रा. पाचखेड, ता. पुलगाव, जि. वर्धा) असे आहे. याप्रकरणी तिच्या वडिलांनी जावयावरच संशय व्यक्त केला असून आरोपी घटनेनंतर मृत तरुणीचा मोबाईल घेऊन फरार झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मंजूचा विवाह दोन वर्षांपूर्वी संदीप रामू पचारे याच्याशी झाला होता. मात्र विवाहानंतर पतीकडून होणाऱ्या छळामुळे तिने त्याचे घर सोडून वडिलांकडे राहण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर तिने न्यायालयात घटस्फोटासाठी याचिका दाखल केली होती. या प्रकरणाचा निकाल २५ जून २०२६ रोजी लागला होता.
निकालानंतर दुसऱ्याच दिवशी मंजू कामावरून घरी परतल्यानंतर पाण्याची बाटली घेण्यासाठी बाहेर गेली असताना, हिरणवार गल्लीत दबा धरून बसलेल्या अज्ञात व्यक्तीने तिच्यावर अचानक हल्ला केला. आरोपीने तिच्या गळ्यावर आणि पोटावर सपासप वार करून तिची हत्या केली आणि घटनास्थळावरून मोबाईल घेऊन पळ काढला.
घटनेनंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली असून जुनी कामठी पोलिस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फरार आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आली आहेत.


