नाशिक : मुंबईच्या लोकमान्य टिळक टर्मिनसहून बिहारमधील रक्सौलकडे निघालेल्या कर्मभूमी एक्सप्रेस (ट्रेन क्र. १२५४६) मधून तीन युवक खाली पडल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. ही घटना शनिवारी (ता. १८ ऑक्टोबर) रात्री नाशिक रोड परिसरात घडली आहे. या अपघातात दोन युवकांचा जागीच मृत्यू झाला, तर एक युवक गंभीर जखमी अवस्थेत आहे. जखमीवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
ही घटना नाशिक रोड रेल्वे स्थानकापासून काही अंतरावर, पवारवाडी येथील साईनाथनगर परिसरातील मारुती मंदिराजवळ रात्री ८:१८ नंतर घडली. रेल्वे न थांबता पुढे निघाल्यानंतर ओढा रेल्वे स्थानकाच्या स्टेशन प्रबंधकांनी नाशिक रोड रेल्वे प्रशासनाला हनुमान मंदिराजवळील ढिकलेनगर परिसरात तीन युवक रेल्वेतून खाली पडल्याची माहिती दिली.
नाशिक रोड पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक माळी आणि हवालदार भोळे यांनी भुसावळकडे जाणाऱ्या रेल्वे मार्गावरील किलोमीटर १९०/१ ते १९०/३ दरम्यान दोन युवक मृत आणि एक गंभीर जखमी अवस्थेत आढळले. जखमीला तात्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मृत आणि जखमी युवकांची ओळख अद्याप पटलेली नाही.
दिवाळी सणामुळे रेल्वेत प्रचंड गर्दी होती. प्राथमिक तपासात, दरवाजाजवळ उभे असलेले हे युवक गर्दीमुळे तोल जाऊन खाली पडले असावेत, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. हे युवक सणासाठी गावी जात होते की बिहार विधानसभा निवडणुकीसाठी, याचा तपास सुरू आहे.


