कोण, म्हणतं नरेंद्र मोदी स्टेडियम भारतीय क्रिकेट संघासाठी धार्जिणे नाही. सुर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने नेमक्या क्षणी सर्वोत्तम आणि वर्चस्वपूर्ण अपेक्षित खेळ करत सगळ्या शंका कुशंका, अंदाज आणि अंधश्रद्धा साफ पुसून काढल्या. भारतीय संघाने अंतिम सामन्यात काय दाखवलं नाही…फलंदाजीचा अपेक्षित धडाका….गोलंदाजीतील अचूकता….विजयाची ईच्छाशक्ती….सर्वोत्तम सांघिक भावना सारं सारं भारतीय संघाने या सामन्यात दाखवून दिले. ही लेख मालिका सुरु करतानाच सांगितलं होतं भारतीय संघ जिंकणार यात शंकाच नाही. पण, या विजेतेपदापर्यंत पोहोचण्यासाठी काही चढउतार जरुर पहावे लागले. भारताने अंतिम सामन्यात जो काही खेळ दाखवला त्याला तोड नाही. भारतीय संघाने हा दाखवलेला खेळ संपूर्ण स्पर्धेत पहिल्या सामन्यापासून अपेक्षित होता. कारण, ट्वेन्टी २० या लघुत्तम वेगवान क्रिकेट प्रारुपात भारतीय संघ एकमेव अद्वितीय संघ आहे. या संघात पहिल्या क्रमांकापासून अखेरच्या क्रमांकापर्यंतचा प्रत्येक खेळाडू अशी क्षमता राखून आहे की एक खेळला नाही, तर दुसरा तेवढ्याच अधिक क्षमतेने खेळू शकतो.
आज तरी या क्रिकेट प्रारुपात भारतीय संघाला हरवण्यासाठी समोरच्या संघाला दिव्यातून जावे लागणार आहे. टी २० क्रिकेटमध्ये भारतीय संघ असं शिवधनुष्य आहे की जे उचलणं सोडा ते पेलण्याची क्षमता कोणत्याच संघात नाही. अंतिम सामन्यातील कामगिरी हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. भारतीय संघ व्यवस्थापनाने अंतिम सामन्यासाठी अभिषेक शर्मा आणि वरुण चक्रवर्ती या खेळाडूंवर विश्वास दाखवला. अभिषेकने हा विश्वास अगदी मोक्याच्या वेळी सार्थ करुन दाखवला. संजू सॅमसनने आपल्याला वगळणे किंवा विचार न करणे अयोग्य होते हे सलग तिसऱ्या सामन्यात दाखवून दिले. इशान किशनने आपण सुधारलो असल्याचे दाखवून दिले. सुर्यकुमार फलंदाजीत अपयशी ठरला, पण कर्णधार म्हणून त्याने संघाला चांगले बांधून ठेवले. अभिषेक आणि वरुण अपयशी होत असताना त्याने दोघांवर दाखवलेला विश्वास सर्वात महत्वाचा होता. मात्र, संजूवर विश्वास ठेवायला त्याला उशीर झाला. शुभम दुबे हा तळातल्या फळीत गवसलेला नवा तारा म्हणता येईल. फार मोठी खेळी शुभम खेळला नाही. पण, जबाबदारी आल्यावर प्रत्येक वेळेस त्याने भारतीय संघाला तारुन नेले. अंतिम सामन्यात अखेरच्या षटकात त्याने कुटलेल्या २४ धावा कशा विसरता येतील.
फलंदाजांनी आपले काम चोख बजावल्यानंतर वेळ होती गोलंदाजांची. टिम सेफर्ट आणि फिन अॅलन हे आक्रमक फलंदाज समोर होते. पण, इंग्लंडसमोर जसे आव्हान होते. तसेच आव्हान न्यूझीलंडसमोर होते. टी २० क्रिकेट कितीही वेगवान असले तरी आव्हानाचा पाठलाग करताना इतके मोठे आव्हान नक्कीच एव्हरेस्ट एवढेच असते. अशी आव्हानं क्वचित पार केली जातात. यासाठी समोरच्या संघाकडून अविश्वसनीय खेळी अपेक्षित असते. पण, ती होणार नाही याची काळजी भारतीय गोलंदाजांनी जरुर घेतली. अक्षर पटेलने आपली जबाबदारी चोख पार पाडली. वरुणने धावांचा डोंगर मिळाल्यावर निर्धास्त गोलंदाजी केली. अर्शदीप त्याची षटके नियोजनानुसार टाकत होता. बुमरा…आता या गोलंदाजाबद्दल काय बोलावे. आपण का श्रेष्ठ आहोत हे त्याने पुन्हा एकवार सिद्ध केले. टी २० क्रिकेट कारकिर्दीत प्रथमच ४ गडी बाद करताना त्याने केवळ १५ धावा दिल्या. भारताचे अन्य गोलंदाज अपयशी ठरले, तरी बुमरा असा आहे की अपयश हा शब्दच जणू त्याच्या डिक्शनरीत नाही. या अशा सगळ्या वर्चस्वपूर्ण कामगिरीने भारताने इतिहास घडवला. सलग दुसऱ्यांदा टी २० विश्वचषक पटकावणारा आणि तिसऱ्यांदा अशी कामगिरी करणारा भारतीय संघ एकमेव ठरला आहे.
आता थोडं न्यूझीलंड संघाविषयी बोलूयात. ,स्वतःहून पायावर कुऱ्हाड कशी मारुन घ्यायची हे न्यूझीलंडकडून शिकायला हवं. फलंदाजीला पोषक खेळपट्टी…१९० ते २०० च्या आसपास धावा करा आणि गोलंदाजांना त्यांचे काम करायला वाट द्या अशी ही खेळपट्टी. हे सगळं सांगताना क्रिकेट तज्ज्ञांचे घसे कोरडे पडले होते. पण, हाय रे..सॅंटनेरने नाणेफेक जिंकली आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा आश्चर्यकारक निर्णय घेतला. हा निर्णय घेतला तर घेतला..जोडीला संघातून ऑफ स्पिनर मॅकोंचीला वगळले. भारतीय संघात डावखुऱ्या फलंदाजांची रांग असताना हा निर्णय इतका अनपेक्षित होता की नाणेफेक झाल्यावर हस्तांदोलन करताना सुर्यकुमारलाही ऑफ स्पिनर नाही घेतलास असे विचारावेसे वाटले. दुसरी गोष्ट पॉवर प्ले. कालच्याच स्तंभात हा सामना पॉवर प्लेच्या षटकातील वर्चस्वाचा असणार हे म्हटले होते. नेमके तसेच घ़डले. भारताने सहा षटकांत ९२ धावांची मजल मारताना अर्धा सामना तेथेच जिंकला होता. न्यूझीलंडच्या फलंदाजीत ती क्षमता होती. पण, आव्हानाच्या पाठलागाचे आणि समोर बुमराचे दडपण त्यांना विसरता आले नसते हे सत्य होते. त्यामुळे पॉवर प्लेच्या षटकातंच भारताचा विजय आणि भारतीय क्रिकेटचा इतिहास लिहायला सुरुवात झाली. अभिषेकने न्यूझीलंडचा अखेरचा फलंदाज बाद केल्यावर ही पाने भरली. टी २० विश्वचषकाच्या क्रिकेटची पाने भविष्यात जेव्हा केव्हा उघडली जातील, तेव्हा प्रत्येक पान भारताच्या या क्रिकेटमधील वर्चस्वाची साक्ष देई. G o A T..अर्थात ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाईम..! थ्री चियर्स फॉर टिम इंडिया…हिप..हिप..हुर्रे..!


