बांगलादेश क्रिकेट मंडळाचे बंड, आयसीसीकडून बांगलादेश संघाची हकालपट्टी आणि त्यानंतर पाकिस्तान क्रिकेट मंडळाची आडमुठी भूमिका अशा सगळ्या पार्श्वभूमीवर सुरु झालेल्या टी २० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या महासंग्रामाची अखेरची लढत आज अहमदाबादच्या नरेंद्र मोदी मैदानावर पार पडणार आहे. भारतीय संघाला सलग दुसऱ्या, तर न्यूझीलंड संघाला पहिल्या विजेतेपदाची आस लागून राहिलेली असेल. विश्वचषकाच्या महामंचावर भारत आणि न्यूझीलंड या संघा दरम्यान होणारा हा महामुकाबला क्रिकेट चाहत्यांसाठी पर्वणी ठरणार आहे.
भारताने सलग दुसऱ्यांदा विजेतेपदावर नाव कोरले, तर अशी कामगिरी करणारा तो पहिला संघ ठरणार आहे. भारताला हा इतिहास घडविण्याची सर्वोत्तम संधी आहे. मात्र, मोदी मैदानावर भारताला यापूर्वी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत निर्णायक लढतीत पराभवाचा सामना करावा लागला होता. हे मैदान विजेतेपदाच्या लढतीत भारतासाठी धार्जिणे नाही अशी भावना असली, तरी हा इतिहासही बदलण्याची संधी भारतीय संघासमोर आहे. क्रिकेटच्या लघुत्तम प्रारुपातील या सर्वात वेगवान क्रिकेटमध्ये आज मितीला भारतीय संघाचा हात कुणी धरु शकत नाही. पण, या स्पर्धेत भारताने हा हात धरण्याची संधी प्रतिस्पर्धी संघाला निर्माण करुन दिली आहे. ज्या वर्चस्वाने भारतीय संघाकडून कामगिरीची अपेक्षा होती ती नक्कीच पूर्ण झालेली नाही. संघातील प्रत्येक खेळाडूकडे सामना जिंकून देण्याची स्वतःची शैली असून देखिल अनेक सामन्यात भारताला अगदी शेवटच्या क्षणापर्यंत झुंज द्यावी लागली आहे. अभिषेक शर्मा, वरुण चक्रवर्ती हे प्रमुख खेळाडू जे स्पर्धेपूर्वी भारतासाठी टी २० क्रिकेटमध्ये मॅच विनर होते, ते या स्पर्धेत आपली छाप पाडू शकलेले नाहीत.
आता निर्णायक लढतीसाठी या दोघांपैकी भारतीय संघ कुणाला संधी देणार की दोघांनाही बदलून नव्या खेळाडूला संधी देणार ही चर्चा ऐरणीवर आहे. अर्थात, संघ व्यवस्थापन आतातरी संघात बदल करण्याचे धाडस दाखविण्यासाठी तयार नाही असेच दिसून येत आहे. संजू सॅमसनवर अगदी अखेरच्या क्षणी दाखवलेला विश्वास त्याने सार्थ ठरवला असला, तरी दुसऱ्या बाजूने भारतीय फलंदाज सातत्य दाखवू शकलेले नाहीत. इशान किशन, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, सुर्यकुमार यादव हे प्रमुख फलंदाज आपला प्रभाव पाडू शकलेले नाहीत. शिवम दुबे हळूच येऊन चमकून गेला. पण, त्यालाही सातत्य दाखवता आलेले नाही. स्पर्धेसाठी फिरकी गोलंदाजांना मदत करणाऱ्या खेळपट्ट्या बनविण्यात आल्या तरी भारतीय फिरकी गोलंदाज अन्य गोलंदाजांच्या तुलनेत म्हणावे तेवढे यश मिळवू शकलेले नाही. वरुणने जरुर १३ गडी बाद केले असले, तरी यात साखळी सामन्यातील बळींची संख्या अधिक आहे. अव्वल आठ फेरीत त्याला अपयश आले आहे. कुलदीप पवार या गुणी फिरकी गोलंदाजाचा भारताने स्पर्धेत हवा तेवढा उपयोग करुन घेतलेला नाही. अशा वेळी जसप्रित बुमरा पुन्हा एकदा आपल्या चार षटकांतही भारतीय संघाचा तारणहार ठरला आहे. क्षेत्ररक्षणात उपांत्य फेरीत दाखवलेली सुधारणा अंतिम फेरीसाठी निश्चित दिलासा देणारी ठरावी.
तुलनेत दुसरीकडे न्यूझीलंडची स्पर्धेची सुरुवात चांगली होती. मात्र, अव्वल आठ फेरीत त्यांना प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागली आणि अन्य संघाच्या यशापयशावर त्यांना अवलंबून रहावे लागले होते. या सगळ्या पार्श्वभूमीवर उपांत्य फेरीत प्रवेश केल्यावर त्या निर्णायक सामन्यात एक वेगळाच न्यूझीलंड संघ समोर आला. दक्षिण आफ्रिका सारख्या तगड्या संघाला या संघाने एकतर्फी हरवले. आधी गोलंदाजांनी वेसण घातल्यावर फिन अॅलन, टिम सेफर्ट या सलामीच्या जोडीने दक्षिण आफ्रिका गोलंदाजीच्या चिंधड्या उडवल्या होत्या. या जोडीची ही पहिलीच वेळ नव्हती. साखळी सामन्यात या जोडीने १७६ धावांचा पाठलाग सहजपणे अभेद्य भागीदारी करत पार केला होता.
मोदी स्टेडियमची खेळपट्टी फलंदाजांना साथ देणारी राहणार हे निश्चित आहे. त्यामुळे एका सर्वोच्च धावसंख्येचा अंतिम सामना बघायला मिळेल अशी अपेक्षा आहे. न्यूझीलंड संघाकडे गमावण्यासारखे काहीच नाही. स्पर्धेला सुरुवात झाल्यापासून त्यांना संभाव्य विजेतेपदाच्या शर्यतीतही कुणी धरले नव्हते. भारतीय संघ मात्र सुरुवातीपासून विजेतेपदाच्या शर्यतीत होता. त्यामुळे सर्वाधिक दडपण भारतावर राहणार आहे. आम्ही संभाव्य विजेते नाही हे आम्हाला माहित आहे. पण, आम्हाला याची चिंता नाही. आम्ही क्रिकेटचा आनंद घेणार आहोत. आमच्यासाठी हे एक नवे आव्हान असेल आणि छोट्या छोट्या गोष्टींवर आम्हाला काम करावे लागणार आहे असे न्यूझीलंड कर्णधार मिशेल सॅंटनेरने म्हटले आहे. असंख्य चाहत्यांच्या आशा आणि स्वप्नांचा विचार एकीकडे आणि दुसरीकडे प्रथमच विजेतेपद मिळविण्याची महत्वाकांक्षा असा हा महामुकाबला पाहण्यासाठी तयार रहा.


