Wardha Crime : जिल्ह्यात लग्नाच्या आनंदसोहळ्यातच घडलेल्या दुहेरी हत्येने परिसर हादरला आहे. वरातीत नाचगाणी सुरू असतानाच संपत्तीच्या वादातून अल्पवयीन पुतण्याने काका आणि चुलत भावावर चाकूने सपासप वार करत त्यांची हत्या केली.
ही धक्कादायक घटना वर्ध्यातील महिला आश्रमसमोरील हनुमान मंदिराजवळ घडली. प्रभाकर भलमे आणि नितीन भलमे अशी मृतांची नावे आहेत. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपी अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भलमे कुटुंबात बरबडी गावातील संपत्तीच्या वादावरून आधीपासूनच तणाव होता. सुमारे आठ महिन्यांपूर्वीही आरोपी आणि मृतकांमध्ये वाद झाला होता. या पार्श्वभूमीवर आरोपीने आधीच हल्ल्याचा कट रचला होता. हत्येसाठी त्याने ऑनलाइन चाकू मागवल्याचेही समोर आले आहे.
शनिवारी रात्री नातेवाईकाच्या लग्नासाठी सर्वजण वर्ध्यात जमले होते. वरात हनुमान मंदिरात पोहोचली असताना अचानक आरोपीने काका आणि चुलत भावावर चाकूने हल्ला केला. गंभीर जखमी अवस्थेत दोघांना सेवाग्राम रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
आनंदाच्या वातावरणात घडलेल्या या रक्तरंजित घटनेने लग्नसोहळ्यावर शोककळा पसरली. संपूर्ण परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.


