नवी दिल्ली: ऑपरेशन सिंदूर नंतर भारताला आणखी एक मोठे यश मिळाले आहे. कंधार आयसी-८१४ विमान अपहरण प्रकरणाचा सूत्रधार रौफ अझहर एका हल्ल्यात मारला गेल्याचे वृत्त आहे. बुधवारी, रौफ अझहर ऑपरेशन सिंदूरमध्ये मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्काराचे नेतृत्व करताना दिसला.
पहलगाम हल्ल्यानंतर, भारताने पुन्हा एकदा सांगितले होते की, ते दहशतवाद्यांच्या घरात घुसून त्यांना ठार मारतील. रौफचा मृत्यू हे याचे आणखी एक उदाहरण आहे. रौफच्या हत्येनंतर मसूद अझहरलाही मारले जाऊ शकते, अशी अटकळ बांधली जात आहे.
कुटुंबातील दहा सदस्यांचा आधीच मृत्यू
ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तानातील बहावलपूर येथील जैश-ए-मोहम्मदच्या मुख्यालयावर भारतीय हवाई हल्ल्यात मसूद अझहरच्या कुटुंबातील १० सदस्यांचा मृत्यू झाला. काही रिपोर्ट्समध्ये अझहर गंभीर जखमी असल्याचे दिसून आले. पण बुधवारी तो दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्कारात प्रार्थना करताना दिसला. आता बातमी अशी आहे की तो मरण पावला आहे. रौफ अझहरचा मृत्यू हा दहशतवादाला मोठा धक्का मानला जात आहे, कारण तो कंधार आयसी-८१४ अपहरणासह भारतावरील अनेक हल्ल्यांसाठी जबाबदार होता.
ऑपरेशन सिंदूर सुरूच आहे का?
७ मे रोजी भारताने ऑपरेशन सिंदूर राबवून पाकिस्तान आणि पीओकेमधील नऊ दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केले. या हल्ल्यात सुमारे १०० दहशतवादी मारले गेल्याचे वृत्त आहे. या हल्ल्यानंतर पाकिस्तान आणि त्याच्या दहशतवादी हेतूंना मोठा धक्का बसला आहे. तसेच, भारतातील अनेक शहरांवर ड्रोन हल्ले झाले आहेत, ज्यामध्ये पाकिस्तानचे मोठे नुकसान झाल्याचे वृत्त आहे.


