पुणे: पुणे पोलिसांनी कुख्यात आंदेकर टोळीच्या म्होरक्यासह तिघांची नाना पेठेतून धिंड काढली. शहरातील टोळीच्या दहशतीला आळा घालण्यासाठी ही मोठी कारवाई करण्यात आली. पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या आदेशानुसार, कृष्णा बंडू आंदेकर (वय 28), त्याचा चुलत भाऊ शिवराज आंदेकर या तिघांची धिंड काढली.
या टोळीने शहरात अनेक गंभीर गुन्हे केले आहेत. 5 सप्टेंबर 2025 रोजी नाना पेठेत झालेल्या टोळीयुद्धात माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या खुनाचा बदला घेण्यासाठी बंडू आंदेकर टोळीने आयुष कोमकर (वय २४) याचा भरदिवसा पिस्तुलातून गोळीबार करून खून केला होता. त्यानंतर कोंढवा भागात वनराजे खून प्रकरणातील आरोपी समीर काळे याचा भाऊ गणेश काळे याचाही गोळीबार करून खून करण्यात आला होता. या घटनांमुळे शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
आंदेकर टोळीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मकोका) अंतर्गत कारवाई सुरू आहे. पोलिसांनी टोळीच्या बेकायदा बांधकामांवर बुलडोझर फिरवला असून, कृष्णा आंदेकरसह प्रमुख साथीदारांच्या बँक खात्यांवर गोठवणीची कारवाई केली आहे. कोथरूड येथील नीलेश घायवळ, गजानन मारणे, टिपू पठाण यांच्यासह आंदेकर टोळीला होणारी आर्थिक रसद तोडण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले आहेत.
पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी सर्व पोलिस ठाण्यांना स्पष्ट आदेश दिले आहेत की, गुंडांचा आर्थिक कणा मोडायचा आहे. त्यांनी दहशतीच्या बळावर उभारलेली बेकायदा मालमत्ता जप्त करा, त्यांच्या व्यवहारांची प्राप्तिकर विभागाकडून चौकशी करा. तसेच, सोशल मीडियावर गुंडगिरीचे उदात्तीकरण करणाऱ्या चित्रफिती प्रसारित करणाऱ्यांवरही कारवाईचे निर्देश देण्यात आले आहेत.
शहरात सलग होणाऱ्या टोळीयुद्धांमुळे नागरिकांमध्ये निर्माण झालेल्या भीतीला या कारवाईमुळे मोठा आळा बसला आहे. पुणेकरांना यामुळे मोठा दिलासा मिळाला असून, पोलिसांच्या या कठोर भूमिकेचे स्वागत होत आहे.


