नाशिक : नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुका पुन्हा एकदा दुर्दैवी घटनांनी हादरला आहे. काही दिवसांपूर्वी कार विहिरीत कोसळून एकाच कुटुंबातील 9 जणांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच, आता दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये चार शाळकरी मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
पहिली घटना दिंडोरी तालुक्यातील मोहाडी परिसरात घडली. खेरवाडी येथे आयोजित धार्मिक कार्यक्रमादरम्यान रुद्र जाधव आणि ओमकार फटांगळे हे दोघे मुले खेळता खेळता तलावाजवळ गेले. पाण्याची खोली लक्षात न आल्याने दोघेही पाण्यात बुडाले आणि त्यांचा मृत्यू झाला.
दुसरी घटना परमोरी गावाजवळील नदीकाठी घडली. समीर गांगोडे आणि यश पगारे हे दोघे मित्र पोहण्यासाठी नदीवर गेले होते. यावेळी यश पाण्यात बुडू लागल्याचे पाहून समीर त्याला वाचवण्यासाठी गेला; मात्र दुर्दैवाने दोघेही पाण्यात बुडून मृत्युमुखी पडले.
एकाच दिवशी चार शाळकरी मुलांचा मृत्यू झाल्याने संपूर्ण दिंडोरी तालुक्यावर शोककळा पसरली असून नागरिकांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, लातूर जिल्ह्यातही एक धक्कादायक घटना समोर आली आहे. विनयभंगाच्या तक्रारीवर गुन्हा दाखल न झाल्याने मानसिक त्रास सहन करणाऱ्या एका शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची माहिती आहे. आत्महत्येपूर्वी संबंधितांनी काही व्यक्तींवर गंभीर आरोप केले असून, या प्रकरणी दोन पोलिस कर्मचाऱ्यांसह सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.


