Samruddhi Mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर गुरुवारी मध्यरात्री रक्ताचा थरार पाहायला मिळाला. भरधाव ट्रकने पुढच्या ट्रकला धडक दिल्यानंतर लागलेल्या भीषण आगीत चालकाचा जागीच जळून मृत्यू झाला. वालई ते दोनद दरम्यान झालेल्या या अपघातात ट्रकचा अक्षरशः कोळसा झाला आहे.
नेमका अपघात कसा झाला?
मिळालेल्या माहितीनुसार, नागपूरच्या दिशेने जाणारा एक ट्रक प्रचंड वेगात होता. वालई परिसरात पोहोचताच या ट्रकने लोखंडी रोल वाहून नेणाऱ्या दुसऱ्या ट्रकला मागून जोरात धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, पुढच्या ट्रकमधील अवाढव्य लोखंडी रोल उसळले आणि मागच्या ट्रकच्या केबिनवर येऊन पडले. यामुळे ट्रकची केबिन पूर्णपणे दबली गेली.
केबिनमध्ये अडकला जीव; सुटकेचा प्रयत्न ठरला निष्फळ
दत्तात्रय खडतरे (रा. सांगोला, जि. सांगली) असे दुर्दैवी मृताचे नाव आहे. केबिन दबल्यामुळे खडतरे हे आतमध्येच अडकले होते. त्यांनी स्वतःची सुटका करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याच वेळी शॉर्ट सर्किटमुळे ट्रकने पेट घेतला. आगीचा भडका इतका मोठा होता की, बाहेर पडण्याची संधी मिळण्यापूर्वीच खडतरे यांचा आगीत होरपळून मृत्यू झाला.
महामार्गावर वाहतुकीचा खोळंबा
या घटनेनंतर समृद्धी महामार्गावरील वाहतूक काही काळासाठी विस्कळीत झाली होती. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेऊन आग विझवली. मात्र, तोपर्यंत आगीने ट्रक आणि चालकाला पूर्णतः कचाट्यात घेतले होते.
पोलिस कारवाई
घटनेचा पंचनामा करून पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून तो शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. या भीषण अपघातामुळे समृद्धी महामार्गावरील वेगमर्यादा आणि सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.


