Rahul Gandhi On NEET Paper Leak: देशभरातील २२ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्या NEET UG 2026 पेपरफुटी प्रकरणाने आता राजकीय वळण घेतले आहे. या गंभीर मुद्यावरून विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर तोफ डागली आहे. “हा केवळ प्रशासकीय गोंधळ नसून, भाजपच्या भ्रष्ट व्यवस्थेने तरुणांच्या स्वप्नांवर केलेला दरोडा आहे,” अशा शब्दांत त्यांनी आपला संताप व्यक्त केला. दरम्यान, वाढता जनक्षोभ लक्षात घेता केंद्र सरकारने या प्रकरणाची सूत्रे तातडीने CBI (केंद्रीय अन्वेषण विभाग) कडे सोपवली आहेत.
‘पालकांचे दागिने विकले, पण पदरी पडली फसवणूक’
राहुल गांधी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वरून सरकारला धारेवर धरले. ते म्हणाले की, “कठोर मेहनत करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या भविष्याचा लिलाव केला जात आहे. अनेक पालकांनी कर्ज काढून किंवा स्वतःचे दागिने विकून मुलांच्या कोचिंगसाठी पैसे जमा केले होते. मात्र, आज त्यांच्या वाट्याला केवळ पेपरफुटी आणि मानसिक छळ आला आहे.” केंद्र सरकारच्या ‘अमृत काळा’वर टीका करताना, हा काळ देशातील युवकांसाठी ‘विष काळ’ ठरत असल्याचा बोचरा वारही त्यांनी केला.
NEET 2026 की परीक्षा रद्द हो गयी।
22 लाख से ज़्यादा छात्रों की मेहनत, त्याग और सपनों को इस भ्रष्ट भाजपाई व्यवस्था ने कुचल दिया।
किसी पिता ने कर्ज़ लिया,
किसी माँ ने गहने बेचे,
लाखों बच्चों ने रात-रात भर जागकर पढ़ाई की,और बदले में मिला, पेपर लीक, सरकारी लापरवाही और शिक्षा में…
— Rahul Gandhi (@RahulGandhi) May 12, 2026
पेपर माफियांच्या वर्चस्वावर प्रश्नचिन्ह
शिक्षणातील ‘संघटित भ्रष्टाचारा’चा उल्लेख करत राहुल गांधींनी सरकारला जाब विचारला. “जर देशात भविष्य मेहनतीवर नाही, तर पैसा आणि वशिल्यावर ठरणार असेल, तर प्रामाणिक विद्यार्थ्याने जायचे कुठे?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. वारंवार होणाऱ्या पेपरफुटीमुळे ‘पेपर माफिया’ अधिक प्रबळ होत असून सरकारी यंत्रणा हतबल झाल्याची टीका त्यांनी केली.
तपासातील धक्कादायक माहिती आणि परीक्षा रद्द
राजस्थानमधील सीकर येथून फुटलेल्या या पेपरमध्ये ‘गेस पेपर’मधील तब्बल 120 प्रश्न प्रत्यक्ष परीक्षेत जसेच्या तसे आल्याचे समोर आले आहे. NTA (नॅशनल टेस्टिंग एजन्सी) ने या गोंधळानंतर परीक्षा अधिकृतपणे रद्द केली आहे. आता सीबीआय या रॅकेटच्या मुळापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहे.


