सासवड : पुरंदर तालुक्याचे माजी आमदार संजय जगताप यांनी बुधवारी (दि. १६) भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी जगताप यांच्या प्रवेशामुळे पक्षाची ताकद वाढणार असल्याचे सांगितले.
सर्वसामान्यांच्या प्रश्नांची जाण असणारा आणि मतदार संघातील प्रलंबित विषयांना मार्गी लावण्यासाठी भाजपात प्रवेश करतोय, असे सांगणारा संजय जगताप हा लोकप्रतिनिधी मला पहिल्यांदाच भेटला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली पुरंदरमधील विविध प्रकल्पांना गती दिली जाईल. यात पुरंदरचा विमानतळ, गुंजवणी योजना, रेशीम उद्योग, सहकार चळवळ आणि नदीजोड प्रकल्प यांसारख्या महत्त्वाच्या प्रकल्पांचा समावेश असल्याचे सांगत त्यांनी जगताप यांचे चव्हाण यांनी भाजप पक्षात स्वागत केले.
सासवड (ता. पुरंदर) येथील पालखी तळावर बुधवारी (दि. १६) पुरंदर हवेलीचे माजी आमदार संजय जगताप यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला. याप्रसंगी प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पावसकर, प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे, वासुदेव काळे, मकरंद देशपांडे, गणेश भेगडे, रवी अनासपुरे, गिरीश जगताप, बाबा जाधवराव, प्रवीण माने, जालिंदर कामठे, पंडित मोडक, रंजन तावरे, साकेत जगताप, गंगाराम जगदाळे, राजवर्धिनी जगताप, श्रेहल दगडे, अजिक्य टेकवडे, सचिन लंबाते, राणीताई भोसले, गणेश बीडकर, तानाजी थोरात आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी माजी आमदार संजय जगताप यांच्यासोबत पुरंदर-हवेलीतील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे माजी सदस्य, सोमेश्वर साखर कारखान्याचे आजी-माजी संचालक, सासवड आणि जेजुरी नगरपालिकांचे माजी नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, सदस्य, निरा मार्केट कमिटी आणि खरेदी-विक्री संघाचे आजी-माजी सभापती व संचालक, विविध गावांचे आजी-माजी सरपंच, उपसरपंच, विकास सोसायट्यांचे पदाधिकारी, काँग्रेसच्या विविध विभागांचे पदाधिकारी आणि अनेक सहकारी व सामाजिक संस्था-संघटनांचे सदस्यही भाजपमध्ये दाखल झाले.
संजय जगताप महणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजपची विचारधारा संस्थात्मक कार्य आणि समाजात सामाजिक सलोखा आणण्यावर आधारित आहे. भाजपमध्ये विकास आणि विकासाची दिशा आहे. पुरंदर-हवेलीतील विमानतळ, कहा-नीरा-गुंजवणी नदी जोड प्रकल्प, दक्षिण हवेलीतील पाणीपुरवठा योजना, एमआयडीसीचे विस्तारीकरण, उच्च शिक्षण प्रकल्प, जलजीवन प्रकल्प आदी प्रश्नांच्या पूर्ततेसाठी हा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले. महेश राऊत, सागर जगताप, जालिंदर काळे यांनी सूत्रसंचालन केले तर भाजपचे शहराध्यक्ष आनंद जगताप यांनी आभार मानले. जिल्हाध्यक्ष शेखर वढ़णे यांनी प्रास्ताविक केले.


