Maharashtra School: नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वीच राज्यातील पालक, शाळा आणि वाहन चालकांसमोर मोठी आव्हाने उभी ठाकली आहेत. एका बाजूला गगनाला भिडलेले पेट्रोल-डिझेलचे दर आणि दुसऱ्या बाजूला विदर्भातील कडक उन्हाळा, यामुळे यंदा शाळांचे संपूर्ण नियोजन कोलमडण्याची चिन्हे आहेत. या पार्श्वभूमीवर शाळा आठवड्यातून केवळ ३ दिवस प्रत्यक्ष सुरू ठेवून उर्वरित २ दिवस ऑनलाईन वर्ग घ्यावेत, अशी नवी मागणी समोर आली आहे.
इंधन दरवाढीचा स्कूल बस संघटनेला फटका आणि हायब्रिड मॉडेलचा प्रस्ताव
गेल्या काही दिवसांत पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याने स्कूल बस चालकांचे आर्थिक गणित पूर्णपणे कोलमडले आहे. अवघ्या दहा दिवसांत पेट्रोल तब्बल ७.३८ रुपयांनी, तर डिझेल ७.०९ रुपयांनी महागले आहे. या महागाईमुळे जुन्या दरात सेवा देणे अशक्य असल्याचे ‘स्कूल अँड कंपनी बस ओनर्स असोसिएशन’ने स्पष्ट केले आहे. यावर तोडगा म्हणून संघटनेने अनेक प्रमुख मागण्या मांडल्या आहेत. यामध्ये शाळा आठवड्यातून फक्त ३ दिवस प्रत्यक्ष भरवून २ दिवस ऑनलाईन पद्धतीने चालवण्याचा ‘हायब्रिड मॉडेल’ प्रस्ताव, शाळांच्या वेळा दुपारऐवजी केवळ सकाळच्या एकाच सत्रात ठेवण्याची मागणी, आणि सरकारने स्कूल बस क्षेत्राला विशेष सवलती किंवा अनुदान देण्याची मागणी समाविष्ट आहे. राज्य सरकारने या सर्व विषयांवर येत्या १ जूनपूर्वी आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी विनंती संघटनेने केली असून आता सर्वांचे लक्ष सरकारच्या निर्णयाकडे लागले आहे.
नागपूरमध्ये बस भाडेवाढ; पालकांच्या खिशाला कात्री
महागाईची पहिली झळ नागपूरमधील पालकांना बसणार असल्याचे स्पष्ट झाले आहे, कारण नागपूर स्कूल बस व व्हॅन संघटनेने बस भाड्यात १० ते १५ टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. नवीन नियमांनुसार भाडे ठरवण्याचे अंतिम अधिकार परिवहन विभागाकडे असल्याने, या संभाव्य दरवाढीला परिवहन विभाग मंजुरी देणार का, हे पाहणे आता महत्त्वाचे ठरेल.
विदर्भातील उष्णतेची लाट आणि शाळांच्या तारखांमधील बदल
इंधन दरांव्यतिरिक्त विदर्भातील उष्णतेनेही सरकारची चिंता वाढवली आहे. विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये पाऱ्याने ४५ अंश सेल्सिअस ओलांडले असून, उष्णतेची ही तीव्र लाट कायम आहे. या परिस्थितीचा अंदाज घेत गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी महत्त्वपूर्ण संकेत दिले आहेत की, १० जूननंतरही विदर्भातील तापमान असेच राहिल्यास, नेहमीप्रमाणे १५ जून रोजी सुरू होणाऱ्या शाळा यंदा थेट २६ जून रोजी सुरू करण्याचा विचार सरकार करत आहे. यासंदर्भात शालेय शिक्षण विभाग लवकरच आढावा बैठक घेऊन अंतिम निर्णय जाहीर करेल.
नागपूर विद्यापीठाचा विद्यार्थ्यांना दिलासा देणारा निर्णय
वाढत्या उन्हाचा विद्यार्थ्यांना त्रास होऊ नये म्हणून नागपूर विद्यापीठाने एक मोठा निर्णय घेतला आहे. विद्यापीठाने आपल्या सर्व परीक्षा केवळ सकाळच्या सत्रात घेण्याचे ठरवले आहे. तसेच, उष्णतेच्या या वातावरणात विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी परीक्षा केंद्रांची संख्याही वाढवण्यात आली आहे.


