Ambenali Ghat Accident : महाबळेश्वर-पोलादपूर मार्गावरील आंबेनळी घाटात झालेल्या भीषण अपघाताने संपूर्ण सातारा जिल्हा हादरला आहे. कुंभरोशी परिसरापासून काही अंतरावर पोलादपूर हद्दीत एक स्कॉर्पिओ वाहन तब्बल ८०० फूट खोल दरीत कोसळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. वाहनात आठ जण प्रवास करत असल्याची माहिती असून, सर्वांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. आतापर्यंत एका मृतदेहाला बाहेर काढण्यात यश आले असून उर्वरित प्रवाशांचा शोध सुरू आहे.
प्राथमिक माहितीनुसार, अपघातग्रस्त वाहनातील सर्व प्रवासी सातारा जिल्ह्यातील विविध भागांतील रहिवासी होते. मृतांमध्ये रितेश राजेंद्र लोखंडे, सुहास जितेंद्र लोखंडे, महेश अनिल पवार, आदित्य अशोक साळुंखे, करण आनंद शिंगटे, निखिल अभिमन्यू शिंगटे, चालक संदीप अशोक काटकर तसेच अंश समीर चव्हाण यांचा समावेश असल्याची माहिती समोर येत आहे. मात्र प्रशासनाकडून अधिकृत ओळख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही.
शनिवारी उशिरा रात्री किंवा रविवारी पहाटे हा अपघात घडल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. प्रवाशांशी संपर्क होत नसल्याने त्यांच्या नातेवाईकांनी पोलादपूर पोलीस ठाण्यात धाव घेतली होती. त्यानंतर मोबाईल लोकेशन आणि तांत्रिक माहितीच्या आधारे पोलिसांनी शोधमोहीम सुरू केली. तपासादरम्यान आंबेनळी घाटातील खोल दरीत स्कॉर्पिओ कोसळल्याचे स्पष्ट झाले.
घटनेची माहिती मिळताच प्रतापगड सर्च अँड रेस्क्यू टीम, महाबळेश्वर ट्रेकर्स, सह्याद्री ट्रेकर्स तसेच महाड येथील सिस्केप रेस्क्यू टीम यांच्यासह पोलादपूर पोलीस आणि महसूल विभागाची पथके घटनास्थळी दाखल झाली. दरीची खोली, निसरडा उतार, घनदाट जंगल आणि अंधारामुळे बचावकार्य अत्यंत आव्हानात्मक ठरत आहे. तरीही दोरांच्या सहाय्याने बचाव पथके दरीत उतरून वाहनापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत.
शनिवारी रात्रीपासून सुरू असलेली शोधमोहीम रात्रभर सुरू होती. अनेक तासांच्या अथक प्रयत्नांनंतर एका मृतदेहाला बाहेर काढण्यात यश आले असून, शवविच्छेदनासाठी पोलादपूर येथे पाठविण्यात आले आहे. उर्वरित सात जणांचा शोध युद्धपातळीवर सुरू आहे.
या दुर्घटनेची गंभीरता लक्षात घेऊन उपविभागीय पोलीस अधिकारी शंकर काळे, तहसीलदार कपिल घोरपडे तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंद रावडे यांनी घटनास्थळी भेट देत बचावकार्याचा आढावा घेतला.
दरम्यान, अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून घाटातील तीव्र वळणे, रात्रीचा प्रवास, वेग किंवा वाहनावरील नियंत्रण सुटणे अशा विविध शक्यतांवर पोलिसांकडून तपास सुरू आहे. या हृदयद्रावक दुर्घटनेमुळे सातारा, वाई, महाबळेश्वर, पोलादपूर आणि परिसरात शोककळा पसरली आहे.


