Laxman Hake : मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकारण पुन्हा तापले असून, ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी सरकारवर आणि मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. सोलापुरात प्रसारमाध्यमांशी बोलताना हाके यांनी मनोज जरांगे नावाच्या अनपढ माणसामुळे आमचं आरक्षण संपलं असा आरोप करत सरकारवरही गंभीर प्रश्न उपस्थित केले.
मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्याच्या मुद्द्यावरून हाके यांनी संताप व्यक्त केला. ओबीसी समाजाचं म्हणणं सरकार कधीच ऐकत नाही. जरांगे उपोषणाला बसले की सरकारचं शिष्टमंडळ तिथे जातं आणि त्यांच्या मागण्या आमच्या माथी मारल्या जातात, अशी टीका त्यांनी केली.
१९ मे रोजी चंद्रशेखर बावनकुळे आणि सहा मंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीचाही त्यांनी उल्लेख केला. ओबीसींचे प्रश्न अजूनही प्रलंबित आहेत. जातनिहाय जनगणना झाली पाहिजे. सरकारकडे आमचा डेटा नाही. ओबीसींसाठी किती निधी आहे आणि तो किती लोकांपर्यंत पोहोचतो, याचं वास्तव अत्यंत भयानक आहे, असे हाके म्हणाले.
यावेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही निशाणा साधला. राज्याचे मुख्यमंत्री अर्थतज्ज्ञ आहेत, पण राज्यातील ५० टक्के ओबीसी समाजासाठी केवळ ०.६ टक्के निधी दिला जातो, असा आरोप त्यांनी केला.
तसेच भाजप नेते प्रसाद लाड यांच्यावरही त्यांनी जोरदार टीका केली. प्रसाद लाड जरांगेंकडे जातात, त्यांना आरक्षणातील काय कळतं? असा सवाल करत हाके यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली.
दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांनी सरकारसमोर विविध मागण्या ठेवल्या आहेत. त्यामध्ये मराठवाड्यातील मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देणे, आंदोलनातील गुन्हे मागे घेणे, सारथीच्या योजना पुन्हा सुरू करणे, स्वतंत्र कुणबी आणि मराठा मंत्रालय स्थापन करणे तसेच शिंदे समितीला मुदतवाढ देणे यांसारख्या मागण्यांचा समावेश आहे.


