Maharashtra Weather Update : राज्यातील वाढत्या उकाड्यामुळे हैराण झालेल्या नागरिकांसाठी आणि बळीराजासाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. हवामान तज्ज्ञांनी 29 मेपर्यंत राज्यात मान्सूनपूर्व पावसाची शक्यता वर्तवली असून, यंदा नैऋत्य मोसमी वारे वेगाने पुढे सरकत असल्याने मान्सून महाराष्ट्रात नेहमीपेक्षा काही दिवस आधी दाखल होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
मात्र, मान्सूनच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी पेरणीबाबत अजिबात घाई करू नये, असा महत्त्वाचा सल्ला वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या हवामानशास्त्र विभागाच्या हवामानशास्त्र विभागाने दिला आहे.
विभागप्रमुख डॉ. कैलास डाखोरे यांनी सांगितले की, शेतात किमान 75 ते 100 मिलिमीटर पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये. अपुऱ्या पावसावर पेरणी केल्यास दुबार पेरणीचे संकट निर्माण होऊ शकते आणि त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, यंदा जून महिन्यात राज्यात सरासरीपेक्षा चांगल्या पावसाची शक्यता आहे. मान्सूनपूर्व पावसामुळे तापमानातही घट होणार असून उष्णतेच्या लाटेपासून नागरिकांना मोठा दिलासा मिळेल, असे सांगितले जात आहे.
दरम्यान, मान्सूनपूर्व पाऊस अनेकदा वादळी स्वरूपाचा असतो. त्यामुळे काही भागांत जोरदार वारे, मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर शेतकरी आणि नागरिकांनी शेतात काम करताना तसेच बाहेर प्रवास करताना आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन कृषी विद्यापीठाच्या हवामान विभागाने केले आहे.
मुंबईतही मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली असून दादरमधील शिवाजी पार्क परिसरासह अनेक भागांत हलक्या सरी कोसळल्या. त्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. पुढील काही दिवसांत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
दरम्यान, राज्यातील धरणांमधील पाणीसाठ्याबाबतही महत्त्वाची माहिती समोर आली आहे. सध्या राज्यातील धरणांमध्ये 30.53 टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. जायकवाडी धरणात 37 टक्के, खडकवासला धरणात 57.47 टक्के, तर कोयना धरणात केवळ 13 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.


