Atal Setu : नवी मुंबईतील अटल सेतूवरून एका 28 वर्षीय तरुणाने समुद्रात उडी मारल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून तरुणाचा शोध घेण्यासाठी पोलीस आणि बचाव पथकांकडून युद्धपातळीवर शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे.
उलवे पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या नोंदीनुसार, प्रतीक सुभाष रासकर (वय 28) या तरुणाने रविवारी (7 जून) पहाटे सुमारे 1.29 वाजण्याच्या सुमारास अटल सेतूवरून समुद्रात उडी मारली. या प्रकरणी उलवे पोलीस ठाण्यात हरवलेल्या व्यक्तीची नोंद करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रतीक रासकर हा पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील रहिवासी असून तो शेअर मार्केट क्लासेसशी संबंधित काम करत होता. घटनेपूर्वी त्याने कुटुंबीयांना “बाहेर जेवायला जातो” असे सांगून घर सोडले होते. त्यानंतर तो अटल सेतूवर पोहोचला आणि स्वतःची कार पुलावर उभी करून समुद्रात उडी मारल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
घटनेची माहिती मिळताच उलवे पोलिसांनी तातडीने शोधमोहीम सुरू केली. सागरी सुरक्षा यंत्रणा, बचाव पथके आणि पोलीस समुद्र परिसरात कसून शोध घेत आहेत. मात्र वृत्त लिहिपर्यंत संबंधित तरुणाचा कोणताही ठावठिकाणा लागलेला नव्हता.
या घटनेमुळे प्रतीकच्या कुटुंबीयांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. त्याच्याबाबत कोणतीही माहिती मिळाल्यास तात्काळ उलवे पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी नागरिकांना केले आहे.
दरम्यान, अटल सेतूवरून उडी मारण्याच्या वाढत्या घटनांमुळे पुलावरील सुरक्षा व्यवस्थेबाबत पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित होत आहेत. अशा घटनांना आळा घालण्यासाठी अधिक प्रभावी उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.


