मुंबई: एसटी महामंडळ आर्थिक अडचणीत असतानाच महामंडळाच्या अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार अपर मुख्य प्रधान सचिव परिवहन यांच्याकडे तसेच एसटीचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक हे प्रशिक्षणासाठी गेल्याने त्या पदाचा अतिरिक्त कार्यभार परिवहन आयुक्त यांच्याकडे गेल्याने व त्या दोघांनीही अपेक्षित वेळ न दिल्याने एसटीच्या दैनंदिन कामकाजावर त्याचा परिणाम होत आहे. त्याचा फटका एसटीला बसत असून, प्रवासी संख्या कमी होण्याचे ते एक मुख्य कारण असल्याचे निरीक्षण महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी नोंदवले आहे.
एसटीला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी प्रवाशी संख्येत वाढ व उत्पन्नात वाढ होण्यासाठी वरिष्ठांकडून विभागीय व आगार पातळीवर सतत दबाव राहिला पाहिजे, आढावा बैठका घेतल्या पाहिजेत, असे मत बरगे यांनी व्यक्त केले आहे. मध्यंतरी एसटीचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक माधव कुसेकर यांनी स्वतः काही जिल्ह्यांत जाऊन आढावा बैठका घेतल्या व उद्दिष्ट ठरवून देण्यात आले. त्यातून काही प्रमाणात प्रगती दिसून आली व तोट्याचे प्रमाण कमी होऊन प्रतिदिन दोन कोटी रुपयांवर तोटा आला होता. त्यानंतर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनीही काही आगारांना भेटी देऊन चांगली स्वच्छता करण्यास भाग पाडले.
भाडेवाढीनंतरचे दैनंदिन उत्पन्न ठरवून देण्यात आलेल्या उद्दिष्टांप्रमाणे चार कोटींच्यावर जायला हवे होते, पण ते गेले नाही. त्याचप्रमाणे उत्पन्नवाढीसाठी काही उदिष्ट ठरवून देऊन डिसेंबर महिन्यात प्रशासनाने परिपत्रक काढून ‘पंचसूत्री’ जाहीर केली. त्यात जानेवारी २५ ते मार्च २५ या कालावधीत उत्पन्नवाढ करण्यासाठी काही उपाययोजना घालून देण्यात आल्या. मात्र, त्याला आता तीन महिने व्हायला आले, तरी त्यातून आतापर्यंत काय फलनिष्पत्ती झाली? यावर कुठल्याच स्तरावर आढावा बैठक झाली नसून, वरिष्ठ अधिकारी नसल्याने खालच्या पातळीवरील अधिकाऱ्यांनी बैठका घेतल्याच नाहीत.


